Vidhan Parishad election – सातारा- सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीचे बिगुल वाजताच पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील हालचालींना वेग आला आहे. विशेषतः भारतीय जनता पक्षासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात असून उमेदवारीवरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यापूर्वी २०१६ च्या निवडणुकीत राज्यात भाजप- शिवसेना सत्तेत असतानाही सातारा- सांगली जिल्ह्यांत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते. त्यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू शेखर गोरे यांचा अवघ्या ६३ मतांनी पराभव झाला होता. क्रॉस व्होटिंग आणि काँग्रेस- राष्ट्रवादीतील अंतर्गत मतभेद यामुळे भाजपला राजकीय फायदा झाला होता. मात्र, त्यानंतरच्या दशकात पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. २०२४ च्या विधानसभा निवडणुकांनंतर सातारा आणि सांगली जिल्ह्यांत भाजपने प्रभावी राजकीय वर्चस्व निर्माण केले आहे. विधान परिषद निवडणूक. जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगरपालिका स्तरावर भाजपची ताकद वाढली असून स्थानिक स्वराज्य संस्थांतील सुमारे ३२५ सदस्य भाजपच्या बाजूने असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपचा आत्मविश्वास वाढलेला दिसत असला तरी अंतर्गत समन्वयाचे मोठे आव्हान पक्षासमोर आहे. महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सध्या संक्रमण अवस्थेत आहे, तर शरद पवार गटाची ताकद मर्यादित असल्याचे चित्र आहे. शिवसेनेचाही जिल्ह्यात प्रभाव वाढत असल्याने जागावाटप आणि उमेदवारीवरुन महायुतीतील तिन्ही घटक पक्षांमध्ये चर्चांना महत्त्व प्राप्त झाले आहे. विरोधकांकडून महायुतीतील नाराज गटांना बळ देण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता भाजप नेतृत्वाने गृहित धरली आहे. भाजपकडून धैर्यशील कदम आणि सुनील काटकर यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीयांमध्ये ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे वाढते महत्त्व लक्षात घेता धैर्यशील कदम यांच्या नावाला बळ मिळत आहे. दुसरीकडे खासदार उदयनराजे भोसले यांचे विश्वासू समर्थक सातारा लोकसभा संयोजक सुनील काटकर यांचे नवा पुडे आले आहे. उदयनराजे यांच्या शब्दाला मुख्यमंत्री आणि प्रदेश नेतृत्वात असलेले महत्त्व पाहता काटकर यांचेही राजकीय वजन वाढले आहे. दरम्यान, काँग्रेसकडून आमदार विश्वजित कदम किंवा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कोणती भूमिका घेतात याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. एकूणच ही निवडणूक केवळ जागेची नसून पश्चिम महाराष्ट्रातील आगामी राजकीय वर्चस्वाची दिशा ठरवणारी ठरणार असल्याचे चित्र दिसत आहे.