बीसीसीआय करत आहे आयोजनाचा अट्टहास
मुंबई :- करोडो रुपयांचा तोटा होऊ नये यासाठी बीसीसीआयने आयपीएल स्पर्धेच्या आयोजनासाठी सुरू असलेला अट्टहास कायम ठेवला आहे. या स्पर्धेसाठी आयसीसी, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्धच्या मालिकांचाही एकवेळ बळी देण्याची तयारी बीसीसीआय करत आहे, अशी माहिती एका वरिष्ठ सदस्याने सांगितली आहे.
ही स्पर्धा जर रद्द करावी लागली तर बीसीसीआयला जवळपास 4 हजार कोटी रुपयांचा तोटा होणार आहे. हे टाळण्यासाठी आधी बीसीसीआयने श्रीलंका क्रिकेट मंडळाला आपल्या बाजूने वळवले व आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्याची पाकिस्तानची विनंती धुडकावून लावणे भाग पाडले. त्यानंतर आयसीसीवर दडपण आणून ऑस्ट्रेलियातील टी-20 विश्वकरंडक रद्द करण्यासाठी फिल्डिंग लावली आहे. इतकेच नाही तर बीसीसीआयच्याच दबावाखाली येत ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने ही स्पर्धा आयोजित करण्यास असमर्थ आहोत हे आयसीसीला कळविण्यासाठी आग्रही भूमिका घेतली. तसेच पडद्यामागे अनेक करामती करण्यात आल्याचे संकेत मिळत असून त्यात टी-20 विश्वकरंडक रद्द करा तरच भारतीय संघ ऑस्ट्रेलियाचा दौरा करेल असा इशाराही दिला गेला होता. हा दौरा झाला नाही तर ऑस्ट्रेलिया मंडळाला मोठा तोटा होणार असून त्यांच्या क्रिकेट मंडळावर दिवाळखोरीचे संकट येऊ शकते. ही स्पर्धा व्हावी यासाठी इंग्लंडचा सप्टेंबरमध्ये होणारा भारत दौराही स्थगित करण्यात येणार आहे. याच काळात बीसीसीआय आयपीएलचे आयोजन करणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
त्याचबरोबर अमिराती, श्रीलंका व न्यूझीलंड यांनी ही स्पर्धा आपल्या देशात आयोजित करता येईल असा दिलेला प्रस्तावही बीसीसीआयने गांभीर्याने घेतलेला नाही. मात्र, आयपीएल स्पर्धा घेणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केले होते, त्यामुळे बीसीसीआयचा आयपीएलसाठी अट्टहास सुरू आहे व त्यासाठी येत्या नोव्हेंबरपर्यंतच्या सर्व प्रस्तावित मालिकांचा बळी दिला जाणार आहे, असेही या सूत्राने सांगितले.
केंद्राची परवानगी मिळण्याचा विश्वास………
ही स्पर्धा सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत घेण्याचे बीसीसीआयचे प्रयत्न आहेत. मात्र, करोनाचा धोका अद्याप कायम असल्याने परदेशी संघांना भारतात येणे किती शक्य होणार आहे हे सध्या तपासले जात आहे. केंद्र सरकारने जर परवानगी दिली तरच हे शक्य होणार आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा हे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांचे चिरंजीव असल्याने या स्पर्धेला केंद्र सरकारकडून हव्या त्या परवानग्या मिळतील असा विश्वास बीसीसीआयला आहे, असेही या सूत्राने सांगितले.