मुंबई : आयसीआयसीआय बँक घोटाळा प्रकरणी कोचर दाम्पत्य आणि वेणूगोपाल धूत यांना दोन दिवासांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. कोचर दाम्पत्यासह, वेणूगोपाल धूत यांची सीबीआय कोठडी संपत असल्याने आज त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते.
सीबीआयकडून तिनही आरोपींची कोठडी वाढवून मागितली. परंतु, कोचर दाम्पत्य आणि धूत यांच्या वकिलांकडून सीबीआयच्या मागणीला विरोध करण्यात आला. आरोपींच्या वकिलांनी रिमांड वाढवून देण्यास विरोध दर्शवण्यात आला. तसेच, तीन दिवसांच्या कोठडीत कोणतीही नवी माहिती आरोपींच्या चौकशीतून समोर आलेली नाही. मुळात आरोपींकडे तपासयंत्रणेला देण्यासारखं काहीही नाही, जे होतं ते आधीच तपास अधिकाऱ्यांना दिलेलं आहे, असा दावा कोचर दाम्पत्य आणि धूत यांच्या वकिलांनी न्यायालयात केला आहे.
तिनही आरोपींचा जबाब नोंदवून झाला आहे. आता आणखीन काय चौकशी करणं बाकी आहे? आजच्या सुनावणी दरम्यान कोर्टानं सीबीआयला विचारला. आम्ही केस डायरी बनवली आहे, अद्याप तपास सुरू आहे. चौकशीचे तपशील तपासाच्या या टप्यावर जाहीर करता येणार नाहीत, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी कोर्टाला दिली. न्यायधीश एस.एम. मेनजोगे यांच्यासमोर आजची सुनावणी पार पडली.
कोचर दाम्पत्याला सीबीआयने दिल्लीत अटक केली होती. त्यानंतर शनिवारी सकाळीच मुंबई सत्र न्यायालयात त्यांना रिमांडसाठी हजर करण्यात आले असता त्यांना तीन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली होती. या कोठडीत सोमवारी आणखीन तीन दिवसांची वाढ करत ही कोठडी 28 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती. या रिमांडला कोचर दाम्पत्याने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत अटक आणि कोठडीला आव्हान दिले होते.