दुष्काळामुळे शेतीसह शेतीपूरक व्यवसायही तोट्यात
दुष्काळी पट्ट्यातील संधींवर दुष्काळामुळे घाव
तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यातील तरुणांनी शेती ती वर अवलंबून न राहता शेती पूरक व्यवसाय म्हणून वेगवेगळ्या बॅंका व फायनान्स कंपन्यांची कर्ज घेऊन ट्रॅक्टर्स जेसीपी ट्रॉल्या आदी गोष्टींचे व्यवसाय म्हणून स्वीकारले आहेत. यातील अनेक ट्रॅक्टर्स मराठवाडा विदर्भ या भागात शेतीची बांधबंदिस्ती करण्यासाठी जातात. शिवाय अनेक ट्रॅक्टर व ट्रॉल्या ऊस हंगामात उसाची वाहतूक करतात तर इतर वाहने शेतीची नांगरट, फननी पेरणी आदी गोष्टी केल्या जातात. या उत्पन्नातून या वाहनांसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरले जातात. मात्र सध्या राज्यभरात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती आहेत. त्यामुळे अनेक वाहनांना कोणत्याही प्रकारचे काम उपलब्ध होत नाही. त्यामुळे सध्या या वाहन मालक व चालक हातबल झाले आहेत.
नागनाथ डोंबे
म्हसवड – कृषी व्यावसायाला पुरक व्यवसाय म्हणून ट्रॅक्टरसह अन्य वाहने दुष्काळामुळे माणदेशीवासियांच्या दारातच उभी आहेत. दुष्काळाचा शेतीला फटका बसत आहेच, शिवाय शेतीची कामे ठप्प झाल्याने शेतीपूरक व्यवसायही आतबट्ट्याचा ठरू लागला आहे. माण तालुक्यात व्यवसायिकांचे संख्या भरपूर आहे. ट्रॅक्टरमुळे शेती व वाहतुकीची कामे करून आर्थिक उत्पन्नाचा हातभार मिळवला जात आहे. मात्र सध्या असलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीची कामे ठप्प झाली असून वाहतुकीची कामेही मंदावली आहे. त्यात ऊस हंगाम बंद झाल्यापासून वाहनांना काम शिल्लक राहिले नाही. अशा वाहनांना शेतकऱ्यांनी घरासमोर सावलीला उभे केले आहे. दुष्काळाच्या तडाख्यामुळे कृषी उत्पन्नावर मोठा परिणाम होत असतानाच व लाखो रुपये किमतीच्या वाहनांना जनावरे बांधण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.
कृषी क्षेत्रासाठी यांत्रिकीकरणाचा मोठा फायदा शेतकऱ्यांना झाला आहे. ग्रामीण भागात अनेक शेतकऱ्यांकडे वेगवेगळे ट्रॅक्टर आहेत. शेतीला जोडधंदा म्हणून पशूपालन व्यवसायाबरोबरच ट्रॅक्टर अथवा शेतीची कामे करणारी इतर यंत्राद्वारे अनेक शेतकरी भाडे तत्वावर शेती करून व ऊस खत अशा गोष्टींची वाहतूक करून त्यातून उपजीविका करताना दिसत आहेत.
ट्रॅक्टरच्या माध्यमातून जमीन दुरुस्ती, ऊस वाहतूक, सहा वेगवेगळ्या प्रकारची वाहतूक ट्रॉलीच्या माध्यमातून केली जाते. मात्र गेला ऊस गळीत हंगाम बंद झाल्यापासून ग्रामीण भागातील ट्रॅक्टर्स अथवा इतर यंत्रांना दुष्काळी स्थिती असल्यामुळे सध्या कोणतेही काम नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी ही वाहने, ट्रॉली, अवजारे इत्यादी गोष्टी आपल्या घरासमोरील मोकळ्या जागेत सावलीचा अंदाज घेऊन उभे करण्यात आले आहेत. या लाखो रुपये किमतीच्या वाहनांचा सध्या काहीही उपयोग होत नाही. शेतकऱ्यांकडील जनावरे या वाहनांना बांधण्यात आल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.