नागपूर – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकरांबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. यावरून राहुल गांधींवर भाजपसह अनेकांनी टीका केली. एवढेच काय तर आता या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भाजप राज्यभर ‘सावरकर गौरव यात्रा’ काढत आहेत. उद्धव ठाकरे गटाने देखील यावर नाराजी व्यक्त केली होती. या प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सावरकर हा देशातील मुद्दा नसल्याचे म्हंटले आहे.
नागपूर दौऱ्यादरम्यान पत्रकरांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले की, “आज सावरकर हा राष्ट्रीय मुद्दा नाही. ही जुनी गोष्ट झाली आहे. आपण सावरकरांच्या विरोधात काही गोष्टी बोललो होतो. पण ती वैयक्तिक नव्हती, हिंदू महासभेबद्दल होती. देशात लोकांच्या हिताचे मोठे प्रश्न आहेत, त्यामुळे सावरकरांच्या मुद्यावर जोर देण्याची गरज नाही. मात्र देशाच्या स्वातंत्र्यासाठी सावरकरांनी केलेल्या बलिदानाकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही.”
“सावरकरांना सामाजिक दृष्टिकोन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन होता. सामाजिक दृष्टिकोनातून त्यांनी रत्नागिरीत घर बांधले. घरासमोर एक छोटेसे मंदिर बांधले होते. त्यांनी वाल्मिकी समाजाच्या माणसाला मंदिरात पूजा करण्यासाठी बोलावले. मला वाटते की ही एक प्रगतीशील गोष्ट आहे”, असेही शरद पवार यांनी सांगितले.