– हेमंत महाजन
ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकावर या वर्षी वाढलेल्या संपत्तीपैकी 96 टक्के संपत्ती आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे वाढली. एआयचा वापर ही चौथी औद्योगिक क्रांती आहे.
एआयच्या मदतीने आर्थिक प्रगतीचा रेट वाढवण्यामध्ये अमेरिका सर्वात पुढे आहे. चीनसुद्धा याचा वापर करून आपली आर्थिक क्षमता वाढवत आहे. भारताने एआयचा वापर करण्यात पुढे राहिलेच पाहिजे. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला भारताच्या दौर्यावरती होते त्यावेळी त्यांनी भारत आणि कृत्रिम बुद्धिमत्ता/आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) या विषयावरती आपले विचार व्यक्त केले. एआय हे तंत्रज्ञान जगभरात वेगाने विकसित होत आहे आणि भारतासारख्या देशासाठी यातून अनेक संधी उपलब्ध आहेत. सत्या नाडेला यांच्या मते, एआयमुळे भारताची जीडीपी वाढीला फार मोठी चालना मिळू शकते.
सत्या नाडेला यांची मायक्रोसॉफ्ट कंपनी मोठ्या प्रमाणात भारतामध्ये या क्षेत्रात गुंतवणूक करत आहे. दोन वर्षांपूर्वी भारत सरकारने सत्या नाडेला यांचा पद्मविभूषण देऊन सन्मान केला होता आणि त्यानंतर मायक्रोसॉफ्टचा भारतामध्ये गुंतवणूक करण्याचा वेग नक्कीच वाढला आहे. त्यांच्या अंदाजे 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेतील 500 अब्ज हे तंत्रज्ञानाद्वारे सुसज्ज केलेल्या उत्पादकता सुधारणांमुळे असतील. मायक्रोसॉफ्ट दोन बिलियन भारतीयांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स कोडर्सना प्रशिक्षण देणार आहे. कारण त्यांना वाटते ही क्षमता भारतीयांमध्ये आहे.
एआय जीडीपी वाढवू शकते
उत्पादकता वाढवणे : एआयमुळे अनेक कामे स्वयंचलित होऊ शकतात, ज्यामुळे मानवी श्रम आणि वेळेची बचत होते आणि व्यवसायांना अधिक स्पर्धात्मक बनण्यास मदत होईल.उत्पादकता वाढून उत्पादनात आणि सेवांमध्ये वाढ होऊ शकते.
दक्षता आणि कार्यक्षमता वाढवणे : एआयमुळे विविध क्षेत्रात कार्यक्षमता आणि कार्यप्रणाली सुधारण्यास मदत होते. यामुळे वेळ आणि पैशाची बचत होऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळते.
सरकारी सेवांमध्ये सुधारणा : एआयमुळे सरकारी सेवांमध्येही सुधारणा होतात. सरकारी अधिकार्यांना नागरिकांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा प्रदान करता येतील.
ग्राहकांना चांगल्या सुविधा : एआयमुळे ग्राहकांना चांगल्या सुविधा आणि सेवा उपलब्ध होऊ शकतात. यामुळे ग्राहकांचे समाधान वाढून व्यवसायांना चालना मिळते.
आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात सुधारणा : एआयमुळे आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणता येईल. यामुळे लोकांचे जीवनमान सुधारून अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. एआयमुळे डॉक्टरांना रोगांचे निदान आणि उपचार अधिक चांगल्या प्रकारे करता येतील आणि शिक्षकांना विद्यार्थ्यांना अधिक प्रभावीपणे शिकवता येईल.
नवीन उद्योग आणि रोजगार निर्मिती : एआयमुळे अनेक नवीन उद्योग आणि व्यवसाय निर्माण होतील. एआय तंत्रज्ञान विकसित करणारे, एआय आधारित उत्पादने आणि सेवा प्रदान करणारे आणि एआय तंत्रज्ञान वापरणारे यामुळे रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होऊन अर्थव्यवस्थेची भरभराट होईल.
एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्याची काही आव्हाने
डेटा आणि पायाभूत सुविधा : एआय तंत्रज्ञानासाठी मोठ्या प्रमाणात डेटा आणि मजबूत पायाभूत सुविधांची आवश्यकता असते. भारतात डेटा गोळा करणे आणि व्यवस्थापित करणे अजूनही एक आव्हान आहे. सरकारने डेटा गोळा करण्यासाठी आणि व्यवस्थापित करण्यासाठी योग्य धोरणे आणि पायाभूत सुविधा विकसित करणे आवश्यक आहे.
कौशल्य अंतर : एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी आवश्यक कौशल्ये असलेले कामगार भारतात मर्यादित आहेत. सरकारने एआय शिक्षण आणि प्रशिक्षण कार्यक्रम राबवून आवश्यक कौशल्ये असलेले कामगार तयार करणे आवश्यक आहे.
नियामक वातावरण : एआय तंत्रज्ञानासाठी योग्य नियामक वातावरण तयार करणे आवश्यक आहे.
डीप टेकच्या निधीसाठी एक लाख कोटी
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसकल्पात डीप टेक (ज्यामध्ये एआय सामील आहे) साठी 1 लाख कोटी रुपयांच्या नवीन निधीची निर्मिती करणे आहे. हा निधी संरक्षण क्षेत्रासाठी तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी 50 वर्षांच्या व्याजमुक्त कर्जाचा लाभ घेऊ शकतील अशा कंपन्या आणि व्यक्तींना उपलब्ध असेल. जाणकार तरुणांना आणि कंपन्यांना शून्य किंवा अगदी कमी व्याजावर उपलब्ध करून दिला जाईल. नऊ तंत्रज्ञानाची व्याख्या डीप टेक म्हणून केली आहे. यामध्ये एआय, डेटा स्वायत्तता, क्वांटम-सक्षम तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, हायपरसोनिक तंत्रज्ञान, अंतराळ, उत्पादन आणि ऊर्जा आहेत.
विशिष्ट तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम संगणक, ड्रोन तंत्रज्ञान यामुळे युद्ध पद्धतीमध्ये क्रांती होत आहे आणि हे तंत्रज्ञान रशिया, युक्रेन, हमास, इस्रायलमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे. अत्यंत कमी खर्चामध्ये जुन्या महागड्या शस्त्रांची अत्यंत कमी किमतीमध्ये शिकार करण्यात येत आहे.
परंतु या प्रकारचे तंत्रज्ञान विकसित करणे आणि त्याचा भारतीय सैन्यामध्ये आणि इतर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापर करण्याकरता आपल्याला पुष्कळ संशोधन करावे लागेल. हे संशोधन खर्चिक असते आणि याकरता सध्याच्या बजेटमध्ये जाहीर झालेला फंड सरकारी आणि प्रायव्हेट कंपनीत वापरला जाईल, यामुळे प्रायव्हेट कंपन्यांनासुद्धा कमी खर्चामध्ये भांडवल मिळू शकेल आणि आपला तंत्रज्ञानाचा विकास हा जास्त वेगाने होईल.
एआय आणि भारताचा जीडीपी
सरकारला एआय शिक्षण आणि प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे. एआयचा योग्य वापर करून भारत आपली जीडीपी लक्षणीयरीत्या वाढवू शकतो.