माधव विद्वांस
तमाशाची राणी विठाबाई भाऊ नारायणगावकर यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म पंढरपूर येथे तमाशा कलावंत भाऊ व शांताबाई खुडे यांच्या पोटी पंढरपूर येथे 1 जुलै 1935 रोजी झाला. पिता भाऊ खुडे प्रख्यात शाहीर पठ्ठे बापूराव यांचे शिष्य होते. त्यांचा “भाऊ-बापू मांग नारायणगावकर तमाशा मंडळ’ हा फड स्वातंत्र्यपूर्व काळात प्रसिद्ध होता.
विठ्ठलाच्या कृपेने कन्यारत्न प्राप्त झाले असे मानून मुलीचे नाव विठाबाई ठेवण्यात आले. लहानपणापासूनच विठाबाईंना नृत्याची आवड होती. विठाबाईंचे वडील भाऊसाहेब, काका बापू व सावळा, बहिणी मनोरमा, केशर आणि बंधू शंकर व पांडुरंग हे सारे कुटुंब लोकनाट्यामध्ये काम करीत असत. त्यामुळे नृत्याचे बाळकडू त्यांना घरातच मिळाले.
शेलाटा बांधा, उंच, गौरवर्ण, गोड आवाज, आकर्षक चेहरा आणि नृत्यनिपुणता असे कलाकारास आवश्यक असणारे व्यक्तिमत्त्व असलेल्या विठाबाईंची प्रेक्षकांना भुरळ पडणे स्वाभाविक होते. रमाबाई व केशरबाई यांच्या मार्गदर्शनाखाली विठाबाई लावणी नृत्यामध्ये तरबेज झाल्या. सुरुवातीस आठव्या वर्षी त्या आळतेकर, मामा वरेरकर यांच्या कलापथकात काम करू लागल्या. या पथकात त्यांनी चार वर्षे काम केले.
तेथे काम करीत असतानाच अनेक लोकनाट्ये व नृत्याच्या कार्यक्रमात महाराष्ट्रात व दिल्लीपर्यंत त्यांनी दौरे केले. तमाशा परंपरेत काम करत असताना विठाबाईंनी जेवढे ऐश्वर्य पाहिले होते तेवढेच दुःख, दैन्य अनुभवले. वयाच्या तेराव्या वर्षी वर्ष 1948 साली विठाबाई वडिलांच्या फडात परत दाखल झाल्या. केशर आणि मनोरमा या त्यांच्या भगिनी लावणी गात असत, तर विठाबाई नृत्य करीत असत. विठाबाईंनी वर्ष 1970 मध्ये स्वत:चा “विठा भाऊ मांग नारायणगावकर तमाशा मंडळ’ हा फड स्थापन केला.
विठाबाईंनी या फडाच्या माध्यमातून “आईचं काळीज’, “रायगडची राणी’, “रक्तात न्हाली कुऱ्हाड’ अशी अनेक नवी वगनाट्ये रसिकांच्या समोर आणली. “मुंबईची केळीवाली’ हे त्यांचे वगनाट्य सर्वाधिक लोकप्रिय झाले. विठाबाईंनी 1950 ते 1980 अशी तीस वर्षे तमाशाच्या फडावर अधिराज्य केले. वर्ष 1968 मध्ये पुणे येथे भरलेल्या “अखिल भारतीय तमाशा परिषदे’च्या त्या स्वागताध्यक्षा होत्या.
विठाबाईंनी आपले नृत्यकौशल्य तमाशाबरोबरच चित्रपटांतही साकारले होते. “कलगी तुरा’, “उमज पडेल तर’, “छोटा जवान’, “सर्वसाक्षी’ या चित्रपटांत त्यांची नृत्ये चित्रित झाली होती. भारत-चीन युद्धाच्या दरम्यान विठाबाईंनी सीमेवर जाऊन जवानांचे मनोरंजन करून राष्ट्रसेवाही केली. तमाशाच्या मंचावर काम करताना त्यांनी प्रसूती वेदना सहन करून रसिकांची सेवा केली आहे.
विठाबाईंचे वय वाढत होते व त्याचा परिणाम कलाकाराचे नृत्य अदाकारीवर होतोच.
तसेच चित्रपटामुळे तमाशा लोकांची पारंपरिक नृत्याच्या बाबतीत अभिरूची बदलू लागली होती. फड चालवणे अवघड होत चालले होते. विठाबाईंना मोठी मुलगी मंगला आणि पुढे संध्या, विद्या, भारती, मालती, विजय, कैलास आणि राजेश ही तीन मुले अशी आठ अपत्ये झाली. मुली फडावर काम करू लागल्या, त्यामुळे फडाला काही काळ थोडा आधार मिळाला. कालांतराने मुलींनी वेगळे फड काढल्याने वर्ष 1990 मध्ये फड बंद करून विठाबाईंनी निवृत्ती घेतली.
विठाबाईंना विष्णुदास भावे पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार, विखेपाटील पुरस्कार, जागतिक महिला दिन पुरस्कार, लोकशाहीर भाऊ फक्कड सन्मान, अण्णा भाऊ साठे पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले. 15 जानेवारी 2002 रोजी त्यांचे निधन झाले.