विविधा : राही मासूम रझा

लोकप्रिय “महाभारत’ या दूरदर्शन मालिकेचे संवाद लेखक राही मासूम रझा यांचा आज स्मृतिदिन (निधन 15 मार्च 1992). त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यातील गंगौली नावाच्या गावात 1 सप्टेंबर 1927 रोजी झाला. लहानपणी पोलिओमुळे त्यांनी काही वर्षे अभ्यास सोडला होता. त्यांचे प्रारंभिक शिक्षण गाझीपूर येथे पूर्ण झाले. अलिगढ मुस्लीम विद्यापीठात त्यांनी डॉक्टरेट पूर्ण केली. रुमानी दुनिया या उर्दू मासिकात ते शाहिद अख्तर या टोपण नावाने लिहीत. अलिगढमध्ये राहात असताना राही साम्यवादाकडे झुकले.
एकदा कम्युनिस्ट पक्षाने गाझीपूर नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी कॉ. पब्बर राम यांना उभे करण्याचा निर्णय घेतला. पब्बर राम हे भूमिहीन मजूर होते. राही आणि त्यांचा मोठा भाऊ मुनीस रझा या दोघांनीही कॉ. पब्बर राम यांचा प्रचार करण्यास सुरुवात केली. तर कॉंग्रेसने रझा यांचे वडील बशीर हसन अबिदी यांना उमेदवार म्हणून घोषित केले. दोन्ही भावांनी वैचारिक पायावर उभे राहून वडिलांना ही निवडणूक लढवू नका, असे समजावले.
अब्बा हुजूर यांनी असा युक्तिवाद केला की मी 1930 पासून कॉंग्रेसी आहे. मी पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन करणार नाही. राही मासूम रझा यांचे उत्तर होते, “आपल्या विरोधात पब्बर राम यांना उमेदवारी देण्याची आमचीही बांधिलकी आहे.’ राही घरातील सामान उचलून पक्ष कार्यालयात गेले. एका भूमिहीन मजुराने जिल्ह्यातील नामवंत वकिलाला प्रचंड बहुमताने पराभूत केल्याचे ऐकून सर्वजण थक्क झाले. ही घटना त्यांच्या वैचारिक कणखरतेचे उदाहरण आहे.
दरम्यान, अलिगढ मुस्लीम विद्यापीठात ते उर्दूचे व्याख्याते झाले. येथे राहून राही यांनी अधा गाव, दिल एक सादा कागज, ओस की ड्रॉप, हिम्मत जौनपूर या कादंबऱ्या आणि 1965 च्या भारत-पाक युद्धात शहीद झालेल्या वीर अब्दुल हमीदचे चरित्र लिहिले. क्रांती कथा या नावाने त्यांनी 1857 पासूनचे घटनांचा उल्लेख असलेले पुस्तक लिहिले आणि लहान-मोठ्या उर्दू नझमे आणि गझल लिहिल्या.
कालांतराने ते वर्ष 1968 मध्ये राही मुंबईत आले.
मुंबईत राहून त्यांनी 300 चित्रपटांच्या पटकथा आणि संवाद लिहिले आणि दूरदर्शनसाठी 100 हून अधिक मालिका लिहिल्या, त्यापैकी “महाभारत’ आणि “निमका पेड’ अविस्मरणीय आहेत. “महाभारत’चे लेखन हा त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोच्च बिंदू ठरला. बी. आर. चोप्रांनी त्यांना संवादलेखनासाठी विनंती केली. रझा यांनी व्यस्ततेमुळे नकार दिला. त्यांचे मित्र असल्याने चोप्रा यांना खात्री होती की राही या प्रकल्पासाठी राजी होतील आणि त्यांनी पत्रकार परिषदेत राही मासूम रझा “महाभारत’चे संवाद लिहिणार असल्याची घोषणा केली. या घोषणेने गदारोळ झाला. चोप्रा यांच्याकडे निषेधाची अनेक पत्रे आली. सर्व पत्रे चोप्रा यांनी राही यांच्याकडे पाठवली. दुसऱ्या दिवशी त्यांनी चोप्रा यांना फोन केला, मी गंगेचा पुत्र आहे, आता मी “महाभारत’चे संवाद लिहीन.
शंख ध्वनीच्या पाठोपाठ!
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत!
या संस्कृत श्लोकापाठोपाठ निवेदक हरीश भिमानानींच्या गंभीर आवाजात “मैं समय हूँ!’ या उच्चाराने 2 ऑक्टोबर 1988 रोजी दूरदर्शनवर महाभारत मालिकेतील पंडित नरेंद्र शर्मा यांचे लेखन व राही मासूम रझा यांच्या संवाद रचनेतून कथेची सुरुवात झाली. त्यावेळी लोकप्रियतेचा उच्चांक गाठला गेला व अगदी अलीकडे करोनाच्या लॉकडाऊनमध्येही लोकांना मानसिक दिलासा दिला.
माधव विद्वांस





