– माधव विद्वांस
दोन लाख सुनांची आई म्हणून प्रसिद्ध तसेच पाककलेवर रुचिरा नावाने पहिले मराठी पुस्तक लिहिण्याऱ्या कमलाबाई कृष्णाजी ओगले यांचे आज पुण्यस्मरण. या वर्षी पाडव्याला कमलाबाई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या रुचिरा पुस्तकाला प्रकाशित होऊन 51 वर्षे पूर्ण झाली आहेत.
त्यांच्या विक्रमी पुस्तक प्रकाशनाचा प्रवासही त्यांच्या पाककलेइतकाच रुचकर आहे. कमलाताईंचे पूर्वाश्रमीचे (माहेरचे) नाव गोदुताई अनंत दांडेकर असे होते. त्यांचा जन्म 16 सप्टेंबर 1913 रोजी सांगली जिल्ह्यातील क्रांतिकारकांचे गाव कुंडल येथे झाला. त्यांचे शिक्षण फक्त चौथीपर्यंत झाले होते. त्यांचा विवाह सांगलीच्या कृष्णाजी ओगले यांचेशी झाला. कमलाबाईंच्या पतींनी नोकरीनिमित्ताने बेळगाव, जळगाव, सांगली, मुंबई अशा ठिकाणी वास्तव्य केले.
कमलाबाईंना नेहमी नवनवीन पदार्थ करून बघण्याची आवड होती. बेळगाव, जळगाव अशा भिन्न वातावरणातील प्रांतामध्ये तेथील पदार्थ त्यांनी आत्मसात केले. त्यांच्या सासूबाईंनीही त्यांना पाककलेमध्ये प्रोत्साहन दिले होते. त्यांनी त्यांची कन्या उषा नांदूरकर यांच्या सहाय्याने आपले अनुभव लिहून काढावयास सुरुवात केली. काळा व गोड मसाला, आमटी, बिरद्याची उसळ, वांगी, भात, भाकरी अशा रोजच्या पदार्थासह सणावारासाठी लागणारे पारंपरिक पदार्थही अत्यंत खुबीने त्यांनी मांडले आहेत.
सुरुवातीस पुस्तक प्रकाशनात अडचणी येत होत्या. मात्र, मुकुंदराव किर्लोस्करांच्या किर्लोस्कर समूहामार्फत स्त्री सखी प्रकाशन या संस्थेची स्थापना झाली होती व पहिलेच पुस्तक म्हणून रुचिराचे प्रकाशन केले. त्या वेळी प्रकाशनपूर्व नोंदणी फक्त दहा रुपये होती. ज्येष्ठ साहित्यिक ग. दि. माडगूळकर यांच्या हस्ते वर्ष 1970 च्या भारतीय पंचांगाप्रमाणे वर्ष प्रतिपदेच्या दिवशी या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या सोहळ्यातच पुस्तकाची 2100 प्रतींची आवृत्ती संपून गेली. दुसरी आवृत्ती काढली त्याच वर्षीच्या विजयादशमीपर्यंत पुस्तकाच्या दहा हजार प्रतीची विक्री होऊन प्रकाशन उद्योगात विक्रम नोंदला गेला.
हिंदी, इंग्लिश आणि गुजराथीमधूनही भाषांतरे झाली आहेत. विशेष म्हणजे विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी या पुस्तकाचे कानडीमध्ये भाषांतर केले. त्याच्याही 8 आवृत्त्या निघाल्या. कालमानाप्रमाणे रुचिरा भाग दोन पहिल्या आवृत्तीनंतर 15 वर्षांनी वर्ष 1985 मध्ये प्रसिद्ध झाला. त्यांनी रुचिरा भाग दोनमधून नवीन पदार्थ तसेच फास्ट फूड पद्धतीच्या पदार्थांचा समावेश केला. यालाही प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्याच्याही पहिल्या दहा वर्षांत 7 आवृत्त्या आणि 25 हजार प्रतींचा खप झाला. त्यांच्या पुस्तकांच्या प्रति भेट वस्तू म्हणून दिल्या जाऊ लागल्या.
त्यांना अनेक स्पर्धांमधून परीक्षक म्हणून बोलविले जाऊ लागले. तसेच आकाशवाणीवर त्यांचे कार्यक्रम होऊ लागले. दूरदर्शनवरही त्यांची प्रात्यक्षिके दाखविली जाऊ लागली. त्यामुळे त्यांचा कुंडल ते कॅलिफोर्निया असा जगाच्या पाठीवर संचार झाला. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या नुसत्या प्रसिद्धच नाही तर अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना विविध संस्थांनी पुरस्कार दिले तसेच अनेक मान्यवरांच्या हस्ते सत्कारही केला. आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांची स्मृती व तब्येत चांगली होती. त्यांचे 86 व्या वर्षी 20 एप्रिल 1999 रोजी पुणे येथे निधन झाले.