माधव विद्वांस
मराठी चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीच्या काळातील संगीत दिग्दर्शक शंकर विष्णू ऊर्फ दादा चांदेकर यांची आज जयंती. त्यांचा जन्म 19 मार्च 1897 रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांचे वडील विष्णुपंत मूळचे सातारा जिल्ह्यातील संगम माहुलीचे. व्यवसायानिमित्त ते कोल्हापूर येथे स्थायिक झाले. विष्णुपंत संगीतकार म्हणून मिरजेच्या राजेसाहेबांकडे नोकरीस होते. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांच्यावर गीत, संगीताचे संस्कार झाले होते. त्यांचे शालेय शिक्षण मिरज येथे झाले. वडिलांकडून हार्मोनियम ते शिकले. मिरजेतील संगीतशिक्षक नीलकंठबुवा जंगम यांचेकडून संगीत शिक्षण घेतले.
वर्ष 1914 मध्ये त्यांनी किर्लोस्कर कंपनीत संगीत साथीदार म्हणून काम सुरू केले. त्यानंतर बलवंत संगीत मंडळी, विश्वनाथ संगीत मंडळी इत्यादी नाटक कंपन्यांत त्यांनी संगीत साथीदार म्हणून उत्कृष्ट कार्य केले. काही काळ दादांनी साताऱ्याला संगीतशिक्षक म्हणून 2-3 वर्षे शिकविण्या केल्या. नंतर त्यांची ऑर्गनिस्ट म्हणून कोल्हापूर सिनेटोनमध्ये नियुक्ती झाली. त्यांनी 15 वर्षे नाट्यसृष्टीत काम केले होते. त्यांनी काळे गोरे, ब्रह्मचारी, अशी रंगली रात्र पैजेची, जीव सरला पीळ उरला आदी नाटकांचे संगीत संयोजन केले होते. त्यांना वर्ष 1935 मध्ये भालजी पेंढारकर दिग्दर्शित “कालियामर्दन’ या चित्रपटात संगीत दिग्दर्शक म्हणून पहिल्यांदा संधी मिळाली.
त्यांनी 13 हिंदी आणि 27 मराठी चित्रपटांना संगीत दिले. त्यांनी पुणे येथे 1948 मध्ये “नाट्य कलोद्य’ ही संस्था स्थापन केली. “एप्रिल फुल’, “बहीण भाऊ’, “निर्वासित’ ही संगीत नाटके त्यांनी काढली. आकाशवाणी-पुणे केंद्रावरील कार्यक्रमांचेही त्यांनी संगीत दिग्दर्शन केले.
“नटली चैत्राची नवलाई’ हे “पहिली मंगळागौर’मधील लता मंगेशकर यांचे पहिले गाणे त्यांनीच संगीतबद्ध केले होते. चांदेकरांनी हंस पिक्चर्सच्या मा. विनायक दिग्दर्शित “ब्रह्मचारी’ चित्रपटातील सर्व गीतांना संगीत दिले. त्यातील “यमुना जळी खेळू खेळ कन्हैय्या’ हे त्याकाळची प्रसिद्ध अभिनेत्री मीनाक्षीने पोहण्याच्या पोशाखात साभिनय गायिलेले गाणे लोकप्रिय झाले होते. मा. विनायक यांच्याबरोबर काम करताना त्यांनी “ब्रॅंडीची बाटली’, “अर्धांगी’, “लग्न पहावं करून’, “अमृत’, “संगम’, “पहिली मंगळागौर’ असे चांगले चित्रपट संगीतबद्ध केले.
“जय मल्हार’ या मराठी चित्रपटसृष्टीतील पहिल्या लावणीप्रधान गीताला चांदेकरांनीच संगीत दिले होते. अभंग, गवळणी, लावणी, देशभक्तिपर गीते, भावगीते, बालगीते, स्वरचित्र संगीतिका अशा वैविध्यपूर्ण चित्रपटगीतांना त्यांनी संगीत दिले. त्या वेळेस चित्रपटाची चंदेरी दुनिया येण्याआधी नाटकांचा बोलबाला होता. त्यामुळे चित्रपट गीतांवर नाट्यसंगीताचा प्रभाव होता. हा प्रभाव कमी करून दादा चांदेकरांनी “जय मल्हार’ या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत ग्रामीण संगीताचा पाया घातला. या वेळी त्यांनी संगीतबद्ध केलेली “नांदाय जावे खुशा हितं ऱ्हावं’, “कुठं चाललीस गं चंद्रावळी’, “काठेवाडी घोड्यावरती पुढ्यात घ्या हो मला’, ”
माझ्या व्हटाचं डाळिंब फुटलं’, “छबीदार नार गुलजार चालली नटून’ ही गाणी खूपच लोकप्रिय झाली. चांगले गीत-संगीत यामुळे चित्रपटास प्रसिद्धी मिळू लागली. त्यांनी पुणे आकाशवाणीवर नोकरी करीत असताना 1964 ते 1975 या कालावधीत शेकडो संगीत कार्यक्रमांचं संयोजन आणि परीक्षणही केले. नंतर वयाच्या 78 व्या वर्षी 1975 मध्ये त्यांनी निवृत्ती पत्करली. 27 जानेवारी 1976 रोजी त्यांचे पुणे येथे निधन झाले.