भावाच्या पत्नीचे निधन झाल्याने केला अर्ज : 25 एप्रिलला सुनावणी
पुणे – बंदी घातलेल्या माओवादी संघटनांशी संबंध असल्याच्या कारणावरून अटकेत असलेल्या कवी आणि लेखक वरवरा राव यांनी भावाच्या पत्नीचे निधन झाल्याने विधींसाठी तात्पुरता जामीन देण्याची मागणी युएपीएच्या (बेकायदेशीर प्रतिबंधक हालचाली) विशेष न्यायालयात केली आहे. याबाबत तपास अधिकारी आणि जिल्हा सरकारी वकील यांना न्यायालयाने म्हणणे सादर करण्यास सांगितले असून अर्जावरील 25 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.
सध्या राव हे येरवडा कारागृहात आहेत. त्यांच्या भावजयचे सोमवारी निधन झाल्याची माहिती त्यांना कळाली. राव यांच्या मोठ्या भावाचे यापूर्वीच निधन झाल्याने घरात वरवरा रावच मोठे आहेत. निधनानंतर 9 ते 12 दिवसापर्यंतच्या धार्मिक विधीसाठी घरातील मोठी व्यक्ती उपस्थित राहणे गरजेचे असल्याने त्यांनी विधींसाठी न्यायालयाकडे 29 एप्रिल ते 4 मे या काळात तात्पुरता जामीन मिळावा, यासाठी हा अर्ज दाखल केला आहे. अन्यथा एस्कॉटच्या (पोलीस बंदोबस्तात) उपस्थितीत धार्मिक विधीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. त्यासाठी लागणाऱ्या खर्चाची जबाबदारी ऍड. राव हे घेण्यास तयार असल्याचे त्यांनी अर्जात नमूद केले आहे.
“पेड्डा कर्मा (धार्मिक विधी)’मध्ये दहाव्या दिवसाला महत्त्व असून त्याला “दशा दिन कर्म’ असे संबोधले जाते. या विधीसाठी ऍड. राहुल देशमुख आणि ऍड. पार्थ शहा यांनी न्यायालयाकडे अर्ज दाखल केला आहे.