प्रभात वृत्तसेवा पुणे – वंदे मातरम् गीताने भारतीय स्वातंत्र्यलढ्याला ताकद, ऊर्जा आणि शक्ती दिली. तसेच भविष्यवेधी भारताला दिशा दिली. त्यामुळे हे गीत देशवासीयांच्या दिशादर्शनाचे गीत असल्याचे वर्णन सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी शुक्रवारी केले. वंदे मातरम् गीताच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक मंत्रालय राज्यात हजाराहून अधिक कार्यक्रमांचे आयोजन करमार असल्याचे त्यांनी जाहीर केले. पुणे पुस्तक महोत्सव, सांस्कृतिक कार्यविभाग, वंदे मातरम् जयंती समारोह समिती, जन्मदा प्रतिष्ठानतर्फे बालगंधर्व रंगमंदिरात वंदे मातरम् उत्सवाचे आयोजन केले होते. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे संचालक युवराज मलिक, वंदे मातरम्चे अभ्यासक मिलिंद सबनीस, जन्मदा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष मकरंद केळकर, बागेश्री मंठाळकर, प्रसेनजीत फडणवीस आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी मिलिंद सबनीस यांच्या ध्यास वंदे मातरम्चा या पुस्तकाचे प्रकाशन झाले.संघर्षात्मक आणि रचनात्मक कामासाठी वंदे मातरम् गीत प्रेरणा देते, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. राजेश पांडे यांनी प्रास्ताविक केले. मिलिंद सबनीस यांनी पुस्तक लेखनाची भूमिका मांडली. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. प्रसेनजीत फडणवीस यांनी आभार मानले. यावेळी कवी बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या आनंदमठ कादंबरीवर आधारित संगीत आनंदमठ या नाटकाचा प्रयोग सादर झाला.