प्रभात वृत्तसेवा पुणे – सुरक्षिततेसह जलद सेवा देणाऱ्या रेल्वे विभागातील वंदे भारतला दिवाळीमध्ये प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. पुणे विभागातून धावणाऱ्या पुणे ते नागपूर (अजनी), पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या तीन वंदे भारत रेल्वे गाड्या आहेत. दिवाळीमध्ये दि. १७ ते २७ ऑक्टोबर या दहा दिवसांत या तीनही रेल्वे गाड्यांच्या एकूण ३० फेऱ्या झाल्या असून, यातून २३ हजार ८११ प्रवाशांनी प्रवास केला. त्यातून रेल्वेला दोन कोटी ९४ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे विभागातून दिवाळीला अधिक रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या होत्या. मात्र, दिवाळीच्या वेळेस प्रवाशांना जागा मिळणे कठीण ठरले. त्यामुळे ज्या गाड्यांचे तिकीट उपलब्ध होते, त्या गाड्यांना प्रवाशांनी प्राधान्य दिले. वंदे भारत एक्स्प्रेसचे तिकीट इतर एक्स्प्रेस गाड्यांच्या तुलनेत जास्त असूनही या गाड्यांना मोठा प्रतिसाद दिला आहे. पुणे विभागातून कोल्हापूर, हुबळी आणि नागपूर या तीन मार्गांवर वंदे भारत गाड्या धावतात. यापैकी नागपूरला जाणाऱ्या वंदे भारत गाडीला सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. अजनी (नागपूर) – पुणे वंदे भारतला सर्वाधिक ७ हजार ७२१ प्रवाशांनी प्रवास केला. त्यातून रेल्वेला १ कोटी ०८ लाख ९१ हजार २५२ रुपये उत्पन्न मिळाले. तसेच पुणे-अजनी (नागपूर) वंदे भारतलाही ६ हजार ६६६ प्रवाशांनी प्रवास करीत ९१ लाख ७२ हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. या गाडीला सरासरी १३० टक्के प्रवाशांची उपस्थिती नोंदवली गेली. इतर काळात या गाड्यांचे तिकीट दर जास्त असून, त्यामुळे प्रवाशांचा प्रतिसाद तुलनेने कमी असतो; मात्र दिवाळीच्या गर्दीमुळे प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.