ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. कौशिक बॅनर्जी यांची माहिती
पुणे – शेती मालाच्या उत्पादनात रसायनांचा वापर कमी करणे गरजेचे बनले आहे. जागतिक पातळीवर 171 रासायनिक खते व किटकनाशकांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे तरी सुद्धा भारतात मात्र त्यातील अनेक रासायनिक खते व किटकनाशक वापरली जात आहेत, हे योग्य नाही. निर्यातक्षम उत्पादनात तर रासयनिक मानाकंन तंतोतत पाळावी लागतात. अन्यथा निर्यातीवर परिणाम होऊन देशाचे नुकसान होते, असे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. कौशिक बॅनर्जी यांनी सांगितले.
मराठा चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्रीज ऍग्रीकल्चरच्यावतीने कृषी निर्यात या विषयावर राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती, या परिषदेत बॅनर्जी यांनी ही माहिती दिली. या परिषदेमध्ये महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाचे कार्यकारी संचालक सुनिल पवार, पणन मंडळाच्या निर्यात विभागाचे प्रमुख सतीश वऱ्हाडे,नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ प्लॅट हेल्थ हैद्राबाद चे व्यवस्थापक डॉ.अभय एकबोटे, राज्य शासनाचे कृषी तांत्रिक सल्लागार गोविंद हांडे कृषी निर्यातदार सुधीर चित्राघरे सहभागी झाले होते.
परदेशी नागरिकांमध्ये शेती माल खरेदी करताना मोठी जागरुकता दिसून येते. त्याठिकाणी शेतीसाठी रासायनिक खते वापरण्यावर बंधने आहेत. विशेषत; युरोपीय देशांमध्ये तर हे नियम अत्यंत कडक पद्धतीने पाळले जातात.
सुनिल पवार यांनी कृषी निर्यातीसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार कशाप्रकारे मदत करत असते याची माहिती दिली. ते म्हणाले की, जागतिक बाजारपेठत भारतीय कृषी मालाला मोठी मागणी आहे. त्यासाठी योग्य पद्धतीने नियोजन करण्याची गरज आहे. सतीश वऱ्हाडे, डॉ.अभय एकबोटे,सुधीर चित्राघरे यांची सुद्धा व्याख्याने आयोजित करण्यात आली होती.