UPSC Result: दिल्लीच्या इशिताने देशात, ठाण्याच्या कश्मिराने महाराष्ट्रात पटकावला प्रथम क्रमांक

नवी दिल्ली – केंद्रीय लोकसेवा आयोगाने (युपीएससी) मंगळवारी जाहीर केलेल्या नागरी सेवा परीक्षेच्या निकालात पहिल्या चारही क्रमांकावर पुन:श्च एकदा मुलींनीच बाजी मारली आहे. त्यापैकी दिल्लीच्या इशिता किशोर हिने यंदा देशात तर ठाण्याच्या डॉ.कश्मिरा संखे हिने राज्यात अव्वल येण्याचा मान पटकाविला आहे.
यासह, दुसरा क्रमांक गरिमा लोहियाने तर तिसरा क्रमांक उमा हरती एन हिने पटकाविला आहे. स्मृती मिश्रा चौथ्या आणि गेहाना नव्या जेम्स पाचव्या स्थानावर आहेत. निकाल जाहीर झाल्यानंतर साधारण 15 दिवसांनी उमेदवारांचे गुण संकेतस्थळावर जाहीर केले जाणार आहेत.
अंतिम निकालात एकूण 933 उमेदवारांची निवड झाली आहे. त्यापैकी 345 उमेदवार खुल्या, 99 आर्थिक दुर्बल घटक(ईडब्लूएस), 263 ओबीसी, 154 एससी आणि 72 एसटी प्रवर्गातील आहेत. आयोगाकडून 178 उमेदवारांची राखीव यादीही जाहीर करण्यात आली आहे. भारतीय प्रशासकीय सेवेसाठी(आयएएस) 180 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.
यंदाचे अव्वल दहा
1. इशिता किशोर 2. गरिमा लोहिया 3. उमा हरती एन 4. स्मृती मिश्रा 5. मयूर हजारिका 6. गहना नव्या जेम्स 7. वसीम अहमद 8. अनिरुद्ध यादव 9. कनिका गोयल 10. राहुल श्रीवास्तव
मराठी मुलांचाही दबदबा
यंदाच्या यूपीएससी निकालात मराठी मुलांचाही दबदबा पाहायला मिळतोय. वसंत दाभोळकरने 76 वा क्रमांक, प्रतिक जराड 122 वा क्रमांक, जान्हवी साठे 127 वा क्रमांक, गौरव कायंदे-पाटील 146 वा क्रमांक तर ऋषिकेश शिंदे 183 वा क्रमांक, अमर राऊत 277 वा क्रमांक, अभिषेक दुधाळ 278 वा क्रमांक, श्रुतिषा पाताडे 281 वा क्रमांक, स्वप्नील पवारने 287 वा क्रमांक, अनिकेत हिरडेने 349 वा क्रमांक, संकेत गरुड 370 वा क्रमांक, ओमकार गुंडगेने 380 वा क्रमांक, परमानंद दराडे 393 वा क्रमांक, मंगेश खिलारीने 396 वा क्रमांक पटकावला आहे.





