ठाणे- छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त येथील एका कार्यक्रमात बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जोपर्यंत आमच्या रक्तात छत्रपती आहेत आम्हाला कोणी गुलाम करू शकत नाही. जोपर्यंत आमच्या विचारात छत्रपती आहेत, तोपर्यंत आमचे विचार कोणी थांबवू शकत नाही. जोपर्यंत आमच्या कृतीमध्ये छत्रपतींचे समर्पण आहे, तोपर्यंत आम्ही अन्याय करू शकत नाही. सध्या फडणवीसांनी केलेल्या या भाषणाची जोरदार चर्चा होत आहे.
फडणवीस यांनी या भाषणाचा व्हिडीओही आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. पुढे ते म्हणाले की, शिवजयंती ही छत्रपतींना आठवण्यासाठी नाही तर त्यांच्या मार्गाने चालण्यासाठी आहे. म्हणून मी खरोखर या ठिकाणी सकल मराठा समाजाचे मनापासून अभिनंदन करतो की हा कार्यक्रम आयोजित केला.
दरम्यान, राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी भव्य नजारे उभारण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या सगळीकडे शिवमय वातावरण झाल्याचं पहायला मिळत आहे.