बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे काही महिन्यांपूर्वी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. त्यांच्या या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रात असंतोष निर्माण झाला होता. संपूर्ण राज्यात या हत्येचे पडसाद उमटले होते. या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी शनिवारी मस्साजोगमध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली तसेच तेथील ग्रामस्थांशी देखील चर्चा केली. सुरेश धस यांनी घेतला मोठा निर्णय संतोष देशमुख हत्या प्रकरणात जोपर्यंत देशमुख कुटुंबियांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत स्वागत सत्कार स्वीकारणार नाही, असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे. धाराशिवमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये त्यांनी ही घोषणा केली. दरम्यान शनिवारी सुरेश धस हे परळी दौऱ्यावर होते. त्यापूर्वी त्यांनी मस्साजोगमध्ये जाऊन पुन्हा एकदा संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची आणि तेथील ग्रामस्थांची भेट घेतली. ग्रामस्थांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा देखील त्यांनी केला. धस-मुंडे भेटीची चर्चा सुरेश धस यांनी काही दिवसांपूर्वी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली होती. या भेटीची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. या भेटीवरून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सुरेश धस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. यानंतर आपण मुंडे यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी त्यांची भेट घेतली होती असे स्पष्टीकरण सुरेश धस यांनी दिले होते.