शिरूर : शिरूर तालुक्यात सध्या शेतकरी अभूतपूर्व संकटाचा सामना करत असून अवकाळी पावसाचा तडाखा आणि बाजारभावातील भीषण घसरण यामुळे शेती व्यवसाय अक्षरशः तोट्याचा ठरत आहे. टोमॅटो, कांदा आणि तरकारी उत्पादक शेतकरी सर्वाधिक अडचणीत आले असून उत्पादन खर्चही निघत नसल्याने त्यांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे उभ्या पिकांचा दर्जा खालावल्याने बाजारात मालाला अत्यल्प दर मिळत आहे. विशेषतः नारायणगाव बाजारात टोमॅटोची आवक वाढल्याने दर कोसळले असून, अनेक शेतकऱ्यांना वाहतूक खर्चही निघणे कठीण झाले आहे. खत, बियाणे आणि मजुरीचा खर्च प्रचंड वाढलेला असताना मिळणारा भाव नगण्य असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसला असून, पावसामुळे कांदा सडण्याचे प्रमाण वाढल्याने उत्पन्नात मोठी घट झाली आहे. प्रशासनाने दर स्थिर ठेवावे या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. टोमॅटोला हमीभाव जाहीर करावा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी आणि कर्जमाफी करावी, अशा मागण्या जोर धरत आहेत. प्रशासनाने बाजारात हस्तक्षेप करून दर स्थिर ठेवण्याची मागणी शेतकरी करत आहेत. प्रशासकीय समन्वयाची आवश्यकता प्रशासनाने या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेणे अत्यावश्यक झाले आहे. कृषी विभाग, बाजार समित्या आणि स्थानिक प्रशासन यांनी समन्वय साधून तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. अन्यथा, आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांचे आर्थिक आणि मानसिक संकट आणखी तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तातडीने पंचनामे करण्याची मागणी अवकाळी पावसामुळे टोमॅटो, कांदा, कलिंगड, गवार, गहू व इतर तरकारी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. कृषी विभाग व महसूल विभागाने तातडीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देण्यासाठी मदत करावी, असे आवाहन शेतकरी नितीन उर्फ शंकर पिंगळे यांनी केले आहे. हेही वाचा : Weather Update : अवकाळी पावसानंतर शहरात उकाड्यात वाढ