Unseasonal Rain : थंडीचा निरोप होऊन उन्हळ्याची चाहूल लागली असतानाच, मध्येच आलेल्या अवकाळी पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडवली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा थेट परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर जाणवू लागला आहे. हा पट्टा दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत पसरल्यामुळे राज्यातील अनेक भागांत अचानक वातावरण बदलले असून अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात फोंडाघाटासह परिसरात अवकाळी पावसाने झोडपून काढले. अचानक आलेल्या पावसामुळे सर्वाचीच तारांबळ उडाली. हवेत सुद्धा चांगलाच गारवा निर्माण झाला होता.आजही सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून उकाडा वाढला आहे.अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणाचा फटका आंबा काजू पिकांना बसण्याची शक्यता असल्यामुळे बागायतदारांची चिंता वाढली आहे. उत्तर कोकणात काही भागात दोन दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस झाला होता. तर तळकोकणात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. या हवामानामुळे आंबा, काजू पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. नागपूर शहरासह जिल्ह्यात मध्यरात्री काही परिसरांत पावसाने हजेरी लावली. ऐन उन्हाळ्यात अचानक कोसळलेल्या या पावसामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांची धावपळ उडाली. दरम्यान, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात सध्या अंशत: ढगाळ आकाश राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुसरीकडे, उर्वरित भागांमध्ये तापमानवाढ कायम राहणार असल्याने उष्णतेचा त्रास जाणवू शकतो.