मुंबई – महाराष्ट्रासह देशभरात ठिकठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार येत्या ४८ तासांत पावसाची हजेरी दिसून येणार आहे. राज्यात गेले दोन दिवस विदर्भ आणि मराठवाडा येथे गारपीटीसह अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे.
राज्यात दोन दिवसांपासून विदर्भातील काही जिल्हयांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मकासह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. आता नव्याने ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’ सक्रीय झाला असून राज्यातच नाही तर संपूर्ण देशात हवामानात मोठे बदल घडून येत आहे.
त्यामुळे पुढील काही दिवस अवकाळी पावसाचा अंदाज आहे. विदर्भासह मराठवाड्यात पुन्हा एकदा गडगडाटी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही ठिकाणी गारपीट होण्याची देखील शक्यता आहे.
मध्य प्रदेश, उत्तर छत्तीसगड, झारखंड, बिहार, उत्तराखंड आणि उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी येत्या दोन-तीन दिवसांत ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. मध्य प्रदेशातील अनेक जिल्ह्यांत गारपिटीसह जोरदार वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.