Devendra fadnavis – ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतदानहोण्यापूर्वीच भाजपच्या दोन महिला उमेदवारांनी बिनविरोध विजय मिळवला आहे. दोन दशकांहून अधिक काळ नगरसेविका असलेल्या रेखा चौधरी आणि आसावरी केदार नवरे यांना अनुक्रमे प्रभाग क्रमांक १८ (कचोरे) आणि सावरकर रोड परिसर समाविष्ट असलेल्या प्रभाग क्रमांक २६(अ) मधून बिनविरोध विजयी घोषित करण्यात आले. आता, या महापालिकेत तिसरा उमेदवार बिनविरोध विजयी झाला आहे. प्रभाग क्रमांक 26 ब मधून भाजपच्या रंजना मीतेश पेणकर बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे, भाजपने येथील महापालिकेत विजयाची हॅट्रिक केली असून स्वबळावरील विजयासाठी किंवा सत्ता स्थापनेसाठी भाजप केवळ 57 जागा दूर आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या विजयांचे वर्णन जनतेने दिलेला सर्वोच्च नागरी पुरस्कार असे केले आहे. कचोरे येथील प्रत्येक नागरिकासाठी उपलब्ध राहून समस्या सोडवलेल्या दहा वर्षांच्या कामाची ही पावती आहे. लोकांनी शांत राहून आपला कौल दिला आहे. त्यांच्या नेत्याने आधीच त्यांची मने जिंकली आहेत हे त्यांना माहीत होते, असे ते म्हणाले. आरएसएसची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून आलेल्या नवरे या महानगरपालिकेच्या राजकारणात एक नवीन चेहरा आहेत. चव्हाण यांनी ही माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना व्हिडिओ कॉल केला होता. विजय हा विजयच असतो. पण बिनविरोध विजय हा विश्वासाचा संदेश आहे. ही ऊर्जा आपल्या चांगल्या कल्याण-डोंबिवलीच्या दिशेने होणाऱ्या प्रवासाला बळ देवो, असे फडणवीस यांनी व्हिडिओ कॉलदरम्यान म्हटले. 122 जागा असलेल्या कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपा 65 आणि शिवसेना 57 जागांवर निवडणूक लढवत आहे. त्यामुळे, भाजप शिवसेना युतीच्या एकूण 122 जागांपैकी भाजपने तीन जागा जिंकत आघाडी घेतली आहे. भाजपा महायुतीला येथील विजयासाठी, सत्ता स्थापनेसाठी 61 जिंकाव्या लॉगतील. एकाच दिवसांत नगरसेवक : धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या अर्ज छाननी दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस(शप)पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजीत राजे भोसले यांनी काल तडकाफडकी पक्षाचा राजीनामा देत, शेवटच्या क्षणी भाजपात प्रवेश केला होता आणि त्यांच्या धर्मपत्नी उज्वला भोसले यांना भाजपाचे तिकीट मिळवले होते. मात्र, आज अर्ज छाननी दरम्यान त्यांच्या विरोधात असलेल्या चारही उमेदवारांचे नामांकन अर्ज बाद झाल्याने त्या बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे धुळे मनपातील त्या पहिल्याच नगरसेविका म्हणून बिनविरोध निवडून आल्या आहे. यामुळे, एकाच दिवसात भाजप प्रवेश केला आणि दुसऱ्याच दिवशी नगरसेवक बनल्याचा वेगळाच रेकॉर्ड त्यांच्या नावावर तयार झाला आहे.