पुणे – करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने प्रभावी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले आहे. राज्य शासनाचे पुढील आदेश येईलपर्यंत आजपासून विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभागातील अध्यापानाचे कामकाज बंद राहणार आहे. मात्र विद्यापीठातील सर्व शैक्षणिक व प्रशासकीय विभागातील प्रशासकीय व नियमित कामकाज सुरू राहील, अशी माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी दै. “प्रभात’शी बोलताना दिली.
करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी विद्यापीठ प्रशासनने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना सुटी दिलेली आहे, त्यांनी अनावश्यकरीत्या फिरू नयेत, अशा सूचना सर्व विभागप्रमुखांनी विद्यार्थ्यांना द्याव्यात. जे विद्यार्थी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात राहत असतील, त्या विद्यार्थ्यांनाही अनावश्यक न फिरवण्याचे सूचना द्यावेत. कोणी अनावश्यरीत्या शहरात फिरताना आढळल्यास त्यांच्या विरुद्ध कार्यवाही होऊ शकेल, याची जाणीव विद्यार्थ्यांना करून द्यावी, असा सूचना विद्यापीठाने सर्व विभागप्रमुख, पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील संलग्न महाविद्यालयाच्या प्राचार्यांना कळविले आहे.
परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार होणार
पुणे विद्यापीठाच्या व विभागाच्या इतर परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार होतील. वसतिगृहात अथवा वाचनासाठी बाहेर निघताना परीक्षार्थ्यांनी परीक्षेचे हॉलतिकीट सोबत बाळगावे व आवश्यक असेल तेथे दाखवावेत. परीक्षेबाबत शासनाचे काही सूचना प्राप्त झाल्यास तसे विद्यार्थ्यांना कळविले जातील, अशी माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.
करोनामुळे विद्यापीठातील पुढील सुविधा बंद
1. जयकर ग्रंथालय व अन्य वाचनकक्ष
2. कमवा व शिका योजना
3. व्यायाय शाळा
4. उपवने व उद्याने
5. सर्व क्रीडा सुविधा
6. अत्यावश्यक सेवा वगळून अन्य वाहनसेवा
7. अभ्यागत निवास
8. पाळणाघर
सकाळी व सायंकाळी विद्यापीठात फिरण्यास मनाई
करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठात पूर्वपरवानगीशिवाय आजपासून प्रवेश दिला जाणार नाही. तसेच सकाळी व सायंकाळी फिरावयास येण्याची सुविधाही खंडित करण्यात येत आहे. विद्यापीठाच्या सर्व प्रवेशद्वारातून केवळ विद्यापीठाचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी, विद्यापीठातील रहिवासी यांनाच प्रवेश राहील. तेही ओळखपत्र पाहूनच प्रवेश दिला जाणार आहे. विद्यापीठ प्रवेशद्वारावरील बायोमेट्रिक व्यवस्था या कालावधीत बंद राहील, असेही विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
बंद कालावधीत मूळ गावी जाण्याचा पर्याय
शासनाचे आदेश येईपर्यंत अध्यापन बंद राहणार आहे. या कालावधीत विद्यापीठ आवारातील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मूळ गावी जाण्याचा पर्याय उपलब्ध आहे. या काळात वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने शक्यतो वसतिगृहाच्या बाहेर जाऊ नये, असेही विद्यापीठाने कळविले आहे.