शासनाच्या भोंगळ कारभारावर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला संताप

मुंबई : मुंबई महापालिकेत प्रशासक असल्याने आणि विविध शासकीय विभागांमध्ये किती निष्काळजीपणे काम सुरू आहे याचा थेट अनुभव केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना बुधवारी आला. भाजपचे 4 आमदार आणि मुख्यमंत्री शिंदे गटातील एका आमदाराच्या मतदारसंघातील रखडलेल्या विकासकामांच्या मुद्द्यावर गोयल यांनी सकाळी 11.30 वाजता महापालिका आर-उत्तर कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक बोलावली होती.
बीएमसी, म्हाडा, एसआरए, एमएमआरडीए आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी अपूर्ण माहिती घेऊन या बैठकीला पोहोचले होते. त्यामुळे, संतप्त झालेल्या केंद्रीय मंत्री गोयल यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्या उपस्थितीत सर्वांचा खरपूस समाचार घेतला. लोकसभा निवडणुकीत मुंबईत महायुतीचे मोठे नुकसान झाल्यामुळे गोयल यांनी उत्तर मुंबईत भाजपच्या जागा वाचवण्यासाठी आतापासूनच प्रयत्न सुरू केले आहेत.
महायुतीच्या आमदारांनी त्यांना 19 मोठी विकासकामे रखडल्याची माहिती दिली. त्यामुळे त्यांनी बीएमसी, म्हाडा, एसआरए, एमएमआरडीए आणि जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांची बोरिवली, उत्तर-मध्य महानगरपालिका प्रभाग कार्यालयात संयुक्त बैठक आयोजित केली होती. जेव्हा त्यांनी निर्माणाधीन भगवती रुग्णालयाचे काम, आकुर्ली पुलावरील वाहतूक कोंडीचे निराकरण, अपूर्ण एसआरए प्रकल्प, दहिसर टोल नाका स्थलांतरित करणे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील लोकांचे पुनर्वसन अशा विविध कामांचे अद्ययावत माहिती विचारली असता, अधिकारी समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत.
त्यामुळे संतप्त झालेल्या केंद्रीय मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना खडसावले आणि पुढच्या वेळी पूर्ण तयारीनिशी बैठकीला येण्याचा इशारा दिला. पंतप्रधान मोदींच्या शैलीत विकासकामे पूर्ण करण्यासाठी गोयल आक्रमक होते, तर अधिकाऱ्यांना संथ गतीने काम करण्याची सवय लागली आहे, असे या बैठकीत उपस्थित भाजप आमदारांनी सांगितले.





