Union Budget 2026: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर केला. निर्मला सीतारमण यांनी सलग नवव्यांदा देशाचा देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यातील काही महत्वाचे मुद्दे जाणून घेऊयात… अर्थसंकल्पातील महत्त्वाचे निर्णय कोणते ? केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात देशभरात सात उच्चगती रेल्वे कॉरिडॉर विकसित करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावित कॉरिडॉरमध्ये मुंबई–पुणे, पुणे–हैदराबाद, हैदराबाद–चेन्नई, दिल्ली–वाराणसी आणि वाराणसी–सिलीगुडी या महत्त्वाच्या शहरांमधील मार्गांचा समावेश आहे. महात्मा गांधी ग्राम स्वराज योजनेअंतर्गत ‘एक जिल्हा – एक उत्पादन’ संकल्पनेला बळ देण्यात येणार असून, ग्रामीण भागातील तरुणांना प्रशिक्षण आणि उद्योगाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. केरळ, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये दुर्मिळ खनिजांच्या उत्खननाला गती देण्यात येणार असून, देशांतर्गत कच्च्या मालाची उपलब्धता वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स घटकांच्या उत्पादनासाठी ४० हजार कोटी रुपयांची मोठी तरतूद करण्याचा प्रस्ताव सरकारकडून मांडण्यात आला आहे. देशात रेअर अर्थ मॅग्नेट कॉरिडॉर उभारण्यात येणार असून, त्यामुळे उच्च तंत्रज्ञान उद्योगांना आवश्यक असलेल्या घटकांचा पुरवठा मजबूत होईल. औषध क्षेत्रासाठी जागतिक मानकांशी सुसंगत असा स्वतंत्र औषध नियामक प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशातील औद्योगिक क्षमता वाढवण्यासाठी तीन नवीन केमिकल पार्क उभारले जाणार आहेत. रसायनांच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याच्या उद्देशाने हे केमिकल पार्क देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतील. १ एप्रिलपासून नवा आयकर कायदा लागू होणार; अपघाचत विमा करमुक्त होणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. परदेशात राहणाऱ्या भारतीयांसाठी वैयक्तिक गुंतवणूक मर्यादा ५% वरून १०% पर्यंत वाढवण्यात आली आहे. आयुर्वेद अभ्यासासाठी देशात ३ मोठ्या संस्था उभारणार असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. कंटेनर उत्पादनासाठी आम्ही योजना राबवणार आहोत. टेक्सटाईल सेक्टरसाठी, टेक्सटाईल्स एक्सपांशन योजना राबवणार आहोत. नॅशनल हँडलूम प्रोग्राम द्वारे हातमागला प्राधान्य देणार आहोत. भारताला जागतिक स्तरावरील औषधनिर्मिती केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी व्यापक धोरण राबवले जाणार आहे. बायो-फार्मा क्षेत्रातील संशोधन अधिक सक्षम करण्यासाठी तीन नवीन शैक्षणिक व संशोधन संस्था स्थापन केल्या जाणार आहेत. शेतकऱ्यांसाठी बहुभाषिक एआय टूल तयार करणार. कापूस उत्पादनासाठी नवीन योजना राबवणार. मत्स्य उद्योगाला चालना देणार.पशुपालन व्यवसायाला चालना देणार. मत्स्य पालनासाठी ५०० अमृत जलाशय तयार केले जाणार. नारळ, काजूचे उत्पादन वाढवले जाणार. भारताच्या काजू कोकोला जागतिक ब्रँड बनवणार. भारत सेमीकंडक्टर मिशन अंतर्गत ISM 2.0 ही सुधारित योजना राबवण्यात येणार असून, यामुळे इलेक्ट्रॉनिक्स सप्लाय चेन अधिक मजबूत होणार आहे. क्रीडा साहित्य आणि खेळासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हेही वाचा: Union Budget 2026 : अर्थसंकल्पात तरुण वर्गासाठी कोणत्या तरतुदी?