नवी दिल्ली – कोविडमुळे दोन वर्षाच्या काळात भारतातर्फे जारी करण्यात आलेले व्हीसा निर्बंध उठवण्यात आले असून ही प्रक्रिया आता पुर्ववत करण्यात आली आहे. 156 देशांच्या नागरीकांसाठी पाच वर्षांचा ई-टुरिस्ट व्हिसा आणि सर्व देशांच्या नागरिकांना नियमित कागदी व्हिसा देण्याचे काम पुर्ववत करण्यात आले आहे.
अमेरिकन आणि जपानी नागरीकांना दहा वर्षांसाठी पुर्वी जो व्हिसा देण्यात आला होता त्यावरील निर्बंधही आता उठवण्यात आले आहेत, त्यामुळे या देशातील नागरीकांनाहीं आता भारतात येणे सुरळीत झाले आहे. सर्व ई व्हीसा आणि प्रत्यक्ष कागदी व्हीसा जारी करण्याची प्रक्रिया भारताने सुरू केली आहे असेही संबंधीत अधिकाऱ्यांनी सांगितले.
मध्यंतरी दोन वर्षे भारताने हे व्हीसा जारी करणे कोविडमुळे थांबवले होते. हे प्रवासी आता कोणत्याही विमान कंपनीद्वारे भारतात येऊ शकतात. त्यांच्या भारतातील प्रवेशावरील निर्बंधही मागे घेण्यात येत आहेत. तथापि पर्यटक व्हीसा किंवा ई व्हीसाद्वारे भारतात येऊ इच्छिणाऱ्या कोणत्याही प्रवाशाला जमीनीच्या मार्गावरून अथवा सागरी मार्गावरून भारतात येण्यास मात्र अनुमती राहणार नाही असेही सरकारी सूत्रांनी स्पष्ट केले आहे.