मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीसांकडे निवेदन
सातारा -करोनाच्या संकटात देशाची अर्थव्यवस्था संकटात सापडली असल्याने लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात मॉल, रेस्टॉरंट, बार वगळता इतर सर्व दुकाने, व्यवसाय सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली होती. त्यानुसार सातारा जिल्ह्यात इतर दुकानांसह सलूनची दुकानेही सुरू झाली होती; परंतु लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात सलून दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला.
त्यामुळे सलून चालक, कारागीरांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांची गैरसोय टाळण्यासाठी सलून दुकाने सुरू करण्याचा निर्णय तातडीने घ्यावा, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यंमत्री अजित पवार व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, गेले दोन-अडीच महिने लॉकडाऊन सुरू आहे. या काळात सलून दुकाने बंद असल्याने या व्यावसायिकांचे हाल झाले. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात सलून दुकाने सुरू करण्यास दिलेली परवानगी लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात रद्द करण्यात आली आहे. आधीचा निर्णय अचानक बदलून आठवडाभरातच ही दुकाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यामुळे सलून चालक, मालक व कारागीरांचे जगणे मुश्कील झाले आहे. मॉल व रेस्टॉरंट सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी नुकताच घेतला आहे. त्यामुळे सगळे व्यवसाय सुरू झाल्याने फक्त सलून दुकाने बंद ठेवून काय साध्य होणार? लोकांची केस कापणे, दाढी करण्याची गैरसोय टाळण्यासाठीही सलून दुकाने सुरू असणे आवश्यक आहे. त्यामुळे नियम व निर्बंध घालून ही दुकाने पुन्हा सुरू करण्याचा निर्णय तातडीने घ्यावा.