रत्नागिरी : रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा वाद संपत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. पालकमंत्रिपदाचा वाद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात गेला होता. चार दिवसांपुर्वी मंत्री भरत गोगावले यांनी अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर भरत गोगावले यांनी दोन दिवसात तुम्हाला गोड बातमी मिळेल, असं सूचक विधान केलं होतं. दरम्यान, भरत गोगावले यांनी दिलेली दोन दिवसाची मुदत आज संपली आहे, तरी अद्याप पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला नाही. याबाबत बोलताना भारत गोगावले म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवस दिल्ली दौऱ्यावर होते. त्यामुळे निर्णयाबाबत आणखी दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे. मात्र, पालकमंत्री पद आपल्याच मिळणार आहे, असा दावा भरत गोगावले यांनी केला आहे. नेमकं काय म्हणाले भरत गोगावले ? शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी रायगडाच्या पालकमंत्री पदाच्या नियुक्तीवरून दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. दोन दिवस होऊन गेले, तरी अद्याप निर्णय झालेला नाही. याबाबत भरत गोगावले यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रया दिली आहे. ते म्हणाले, मुख्यमंत्री दोन दिवस हे दिल्लीत होते. त्यामुळे निर्णयाबाबत आणखी दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे. पण, पालकमंत्री पद आपल्याच मिळणार असल्याचा विश्वास गोगावले यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जबाबदारी असल्यामुळे निर्णय आपल्याच बाजूने लागणार आहे. पालकमंत्री पदाचे काम प्रगतीपदावर आहे असंही भरत गोगावले यांनी यावेळी सांगितले. गोगावले यांचा स्वरूपात रायगडला पालकमंत्री पद मिळेल : आमदार महेंद्र दळवी मंत्री भरत गोगावले यांचा स्वरूपात रायगडला पालकमंत्री पद मिळेल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सुध्दा भरत गोगावले यांनाच पालकमंत्री पद मिळावं असं मत आहे. गोगावले हे चार टर्मचे आमदार आहेत. शिवाय ते अन्यायाविरुद्ध लढणारे आहेत. त्यामुळे गोगावले पालकमंत्री होण्यासाठी सर्वांची अपेक्षा आहे. येत्या दोन दिवसात वरिष्ठ स्तरावर पालकमंत्री पदाबाबत निर्णय घोषित होईल, असा दावा शिवसेना शिंदे गटाचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी केला आहे. काय आहे प्रकरण ? विधानसभेच्या निकालानंतर जवळपास दोन महिन्यांनी सर्व जिल्ह्यांची पालकमंत्रिपदे जाहीर झाली. मात्र, पालकमंत्रिपदांच्या घोषणेच्या 48 तासात दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली. यात रायगड आणि नाशिक जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने पत्रक काढून रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदी करण्यात आलेल्या नियुक्त्या स्थगित करण्याचे आदेश जारी केले आहेत. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली होती, तर नाशिकच्या पालकमंत्रिपदी भाजपच्या गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली होती. रायगडमध्ये कॅबिनेट मंत्री भरत गोगावले आणि शिवसेनेच्या इतर आमदारांनी आदिती तटकरे यांच्या नियुक्तीस विरोध दर्शवला होता. दरम्यान, पालकमंत्रिपदाची यादी जाहीर झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच, पालकमंत्रिपदाची यादी धक्कादायक असल्याचे म्हटले होते.