प्रभात वृत्तसेवा इंदापूर – उजनी धरण प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनींच्या मूळ मालक शेतकर्यांना न्याय मिळावा, त्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे तसेच वर्षानुवर्षे सुरू असलेल्या अन्यायाला वाचा फुटावी, या मागणीसाठी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अभिजीत राजेंद्र तांबिले यांनी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन सविस्तर लेखी निवेदन सादर केले. इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव, कांदलगाव व तरडगाव या गावांमधील शेतकर्यांच्या जमिनी 1970 च्या दशकात उजनी धरण प्रकल्पासाठी माती-मुरूम उचलण्याच्या प्रयोजनासाठी शासनाने संपादित केल्या होत्या. त्या काळात शेतकर्यांनी मोठ्या त्यागातून आपली सुपीक शेती शासनाच्या ताब्यात दिली; मात्र त्यानंतरच्या काळात झालेल्या विविध धोरणात्मक बदलांमुळे व अंमलबजावणीतील त्रुटींमुळे मूळ जमीनमालक शेतकर्यांचे हक्क बाधित झाले असल्याचे तांबिले यांनी निवेदनात नमूद केले आहे. अनेक प्रकल्पग्रस्त शेतकर्यांनी स्वतःच्या खर्चाने पाणीपट्टी भरून जमिनी विकसित केल्या असतानाही आज त्यांना जमिनीच्या मालकी हक्क व वहिवाटीबाबत गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे अनेक कुटुंबांची उपजीविका धोक्यात आली असून हा प्रश्न केवळ कायदेशीर मर्यादित नसून सामाजिक व मानवी दृष्टिकोनातूनही अत्यंत गंभीर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निवेदनात तांबिले यांनी यापूर्वी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शेतकर्यांच्या बाजूने सहानुभूतीपूर्वक विचार करून वहिवाटीचे आदेश दिल्याचा उल्लेख केला आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत पुन्हा एकदा शेतकर्यांवर अन्याय होण्याची शक्यता निर्माण झाली असून, याबाबत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याशी चर्चा करून ठोस व कायमस्वरूपी निर्णय घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. उजनी प्रकल्पग्रस्त या तीन गावांतील सुमारे 2,000 एकर जमिनीच्या मूळ जमीनमालकांचे हक्क अबाधित ठेवावेत, त्यांच्या प्रश्नांचा शासनस्तरावर पुनर्विचार करावा, अशी ठाम मागणी तांबिले यांनी केली आहे. या निवेदनासोबत संबंधित शेतकर्यांच्या सह्यांची यादीही कृषी मंत्र्यांकडे सादर करण्यात आली आहे.दरम्यान, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी या विषयाची गंभीर दखल घेत शासनस्तरावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याचे तांबिले यांनी सांगितले. उजनी प्रकल्पग्रस्त शेतकर्यांना न्याय मिळेपर्यंत हा प्रश्न लावून धरला जाईल, अशी ठाम भूमिका त्यांनी यावेळी व्यक्त केली.