मुंबई – सामान्य नागरिकांचे माहागाईने कंबरडे मोडले आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे सामान्यांच्या खिशावर मोठा भार पडला आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांना इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन आज झालेल्या आढावा बैठकीमध्ये केले. यावेळी मोदींनी महाराष्ट्राला देखील सुनावलं. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
पंतप्रधान मोदी आढावा बैठकीमध्ये म्हणाले की, राज्य सरकारांनी देशाच्या हितासाठी तेलावरील व्हॅट कमी करून जनतेला दिलासा द्यावा. यापूर्वीही पेट्रोलचे दर कमी करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात आले आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यांची आढावा बैठक आज पंतप्रधानांनी घेतली यावेळी त्यांनी हे आवाहन केले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या महाराष्ट्र राज्याला केंद्र सरकारकडून सापत्न वागणूक दिली जाते. महाराष्ट्रातील जनतेला हे कळायला हवं म्हणून स्पष्टीकरण देत असल्याचं ठाकरे यांनी नमूद केलं.
“मुंबईत आज एक लिटर डिझेलच्या दरात 24 रुपये 38 पैसे केंद्राचा, तर 22 रुपये 37 पैसे राज्याचा कराचा वाटा आहे. पेट्रोल“च्या दरात 31 रुपये 58 पैसे केंद्रीय कर, तर 32 रुपये 55 पैसे राज्याचा कर आहे. त्यामुळे केवळ राज्य सरकारमुळे पेट्रोल व डिझेल महागले ही वस्तुस्थिती नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
दरम्यान संपूर्ण देशात सर्वात जास्त म्हणजे १५ टक्के जीएसटी महाराष्ट्रातून गोळा होतो. थेट कर आणि जीएसटी रक्कमेत महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी आहे. मात्र असं असूनही महाराष्ट्राला 26 हजार 500 कोटी रुपये जीएसटी थकबाकीपोटी मिळणे अद्याप बाकी असल्याचं मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटलं.
आपत्तीच्या काळात केंद्र सरकारने भरीव मदत केली नाही. याउलट राज्य सरकारने आपत्तीत निकषापेक्षा अधिक मदत दिली. शेतकरी कर्जमाफी केली. कोविड काळात दुर्बल घटकांना आर्थिक सहाय्य केलं, शिवभोजन थाळी मोफत दिल्याचं सांगताना उद्धव ठाकरे यांनी केंद्राकडून सर्व राज्यांना समान वागणूक मिळणे अपेक्षित असल्याचं म्हटलं आहे.