हिंगोली – गद्दारांनी घात केला नसता तर महाराष्ट्र देशात नाही तर जगात नंबर वन झाला असता असा घणाघात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. ठाकरेंनी शिवसेनेतील पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच हिंगोलीत सभा घेतली. या सभेतून ठाकरे यांनी राज्य सरकारसह केंद्र सरकारवर निशाणा साधला. पक्ष फुटीपासून ते बाळासाहेबांचे नाव घेण्याबाबत देखील ठाकरेंनी यावेळी जोरदार टीका केली. यावेळी आगामी काळात होणाऱ्या भारत पाकिस्तान मॅचवरुन देखील ठाकरेंनी भाजपसह पंतप्रधानांवर निशाणा साधला. इतर पक्षांचे नेते चोरणार आणि आम्ही हिंदू आहोत आमची ताकद पाहा, कसली डोंबल्याची ताकद याला नामर्द म्हणतात अशा शब्दात ठाकरेंनी यावेळी भाजपला सुनावले. सरकार आपल्या दारी थापा मारतंय लय भारी असा टोला देखील यावेळी त्यांनी लगावला. डबल इंजिन सरकार त्यात आता आणखी एक डबा अजित दादांचा लागलाय. अजून किती डबे लागणार आहेत, जणू काय मालगाडी आहे का? डबल इंजिन, ट्रिपल इंजिन, चौपल इंजिन. तुमच्या पक्षामध्ये चांगले नेते तयार करायचे काही कतृत्व नाही. तुम्हाला नेते बाहेरचे लागतात, वडील माझे लागतात, पक्ष फोडला पण वडील माझे वापरायचे. का तुमच्या दिल्लीतल्या वडीलांमध्ये मतं मागायची हिम्मत राहिली नाही का? असा प्रश्न विचारात ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला. वर्ल्डकपमधील भारत पाकिस्तान मॅचवरुन भाजपवर निशाणा त्यांना आमची तुलना इंडियन मुजाहिद्दीन बरोबर करायची असेल तर अतिरेक्यांना पाकिस्तान पाठबळ देतो. मग आता जो वर्ल्डकप होणार आहे त्यातील हिंदुस्थान पाकिस्तान सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे हे तुमचं हिंदुत्व आणि राष्ट्र्यत्व आहे का ? असा सवाल यावेळी ठाकरेंनी उपस्थित केला. हिंदुस्थान पाकिस्तान सामना तुम्ही तुमच्या स्टेडियममध्ये घेणार आणि देशप्रेमाचे धडे आम्हाला शिकवणार मग यापेक्षा सुषमा स्वराज बऱ्या होत्या त्यांनी सडकून सांगितलं होत जोपर्यंत पाकिस्तान घुसखोरी थांबवणार नाही तोपर्यंत त्यांच्याशी कोणतेही संबंध आम्ही ठेऊ इच्छित नाही याला म्हणतात देशप्रेम असं देखील ठाकरेंनी यावेळी ठणकावून सांगितलं.