नवी दिल्ली: ५ ऑगस्ट’ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाणार की नाही यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
दरम्यान, यावर भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले, राममंदिराच्या पायाभरणीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निमंत्रण आले किंवा नाही आले, तरी पायाभरणीला त्यांनी जावे. दानवे एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका देखील केली आहे. उद्धव ठाकरेंना राष्ट्रवादी काँग्रेसकडून राममंदिरच्या भूमिपूजनाला जाण्यासाठी प्रमाणपत्र घ्यावे लागेल. आधी शिवसेनेचा नारा होता की ‘पहले मंदिर, फिर सरकार’ आता मात्र पहिले सरकार फिर मंदिर असे झाल्याचे दानवे म्हणाले.
5 ऑगस्टला नरेंद्र मोदींच्या हस्ते मंदिरांचे भूमिपूजन
उत्तरप्रदेशातील अयोध्येमध्ये राममंदिराचे काम ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुरु होणार आहे. राममंदिराच्या भूमिपूजनाची तारीख देखील निश्चित झाली आहे. येत्या 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी मंदिरांचे भूमिपूजन करणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर या भूमिपूजन सोहळ्याला ठराविक लोकच उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.