मुंबई : मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीची (Uddhav Thackeray) तारीख जाहीर होण्यास काही दिवस बाकी असले तरी राजकीय पक्षांनी रणनीती ठरविण्यास सुरुवात केली आहे. विविध संघटना आणि मतदारगटांचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, या निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना (ठाकरे गट) ला मोठा धक्का बसला आहे. मुंबई डबेवाला असोसिएशनने ठाकरे गटाकडून २०१७ च्या निवडणुकीतील आश्वासने न पाळल्याचा आरोप करत, दिलेला पाठिंबा मागे घेतला आहे. आता ते आगामी निवडणुकीत महायुतीला साथ देतील, अशी घोषणा केली आहे. या निर्णयाचा परिणाम मराठी मतदारांवर होईल, असा इशारा राजकीय तज्ज्ञांनी दिला आहे. 2017 च्या निवडणुकीत दिलेली आश्वासने काय होती? २०१७ च्या बीएमसी निवडणुकीदरम्यान शिवसेनेने डबेवाल्यांसाठी विकासात्मक योजना आणि सोयी-सुविधांचे आश्वासन दिले होते. यात डबेवाल्यांना संघटित करून स्वतंत्र कंपनी स्थापन करणे, त्या कंपनीला पहिल्या वर्षी किमान पाच कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य देणे, सायकलींची खरेदी आणि सायकल पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देणे, मुलांच्या शिक्षणासाठी आणि कुटुंबासाठी आरोग्यसेवा देण्यासाठी कॉर्पोरेट व सामाजिक संस्थांमार्फत मदत मिळवून देणे, तसेच डबेवाला भवन उभारणे यांसारख्या सुविधा समाविष्ट होत्या. या आश्वासनांमधून फक्त ‘डबेवाला भवन’ उभारण्याचे वचन काही प्रमाणात पूर्ण झाल्याचा दावा असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी केला आहे. उर्वरित सर्व आश्वासने प्रत्यक्षात आणली गेली नाहीत, असा त्यांचा आरोप आहे. “शिवसेना सत्तेत असताना आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही हे आश्वासने पूर्ण झाले नाहीत,” असे तळेकर म्हणाले. पाठिंबा काढण्यामागे काय कारण? डबेवाला असोसिएशनने गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत ठाकरे गटाला पाठिंबा दिला होता. मात्र, आता निराशा झाल्याने त्यांनी हा निर्णय घेतला. “आश्वासने पूर्ण न झाल्याने आम्ही ठाकरे गटाला ‘अखेरचा जय महाराष्ट्र’ देत आहोत,” असे तळेकर यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे ठाकरे गटाची कठीण स्थिती आणखी बिकट झाली आहे, कारण मुंबईत डबेवाले हे पारंपरिक मराठी मतदारांचे प्रतीक मानले जातात. राजकीय विश्लेषकांच्या मते, हा धक्का मराठी मतदारगटांवर परिणाम करू शकतो आणि ठाकरे गटाच्या मतपेटीवर परिणाम घडवू शकतो. आता महायुतीला पाठिंबा महायुती सरकारने डबेवाल्यांचा प्रलंबित घरांचा प्रश्न सोडवला असल्याने त्यांचा विश्वास संपादन केला आहे, असे तळेकर यांनी सांगितले. “घरांचा प्रश्न सुटल्याने इतर मागण्या पूर्ण होण्याची आशा आहे. म्हणून आम्ही महायुतीला पाठिंबा देत आहोत,” असे त्यांचे म्हणणे आहे. हि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीसाठी चांगली बातमी ठरली आहे, तर ठाकरे गटासाठी आणखी एक आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे बीएमसी निवडणुकीत ‘मराठी अस्मिता’ हा मुद्दा केंद्रस्थानी राहील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.