वसई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पालघर जिल्हा दौऱ्यास आज प्रारंभ झाला. दरम्यान, युती होऊ नये म्हणून काहींनी देव पाण्यात ठेवले होते, आता त्यांनाच पाण्यात बुडवा, असा आदेश उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिला. तसेच त्यांनी काँग्रेसने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यावर देखील टीका केली. वसई येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
काँग्रेसने सत्तेत आल्यास भारतीय दंड संहितेमधील कलम १२४अ देशद्रोहाशी संबंधित कलम वगळू, असे जाहीरनाम्यात म्हटले आहे. यासंदर्भात बोलताना उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे नेते कुणाचे पंतप्रधान होऊ इच्छितात, देशद्रोह्यांचा की देशप्रेमींचा? असा प्रश्न उपस्थित केला.
देशद्रोह हा मुद्दा बाजूला करा असे म्हणणारा कोणी असेल त्या पक्षाला निवडणुका लढवण्याचा अधिकार नसला पाहिजे. अशापक्षांची मान्यता रद्द केली पाहिजे, कश्मीरचा दर्जा आणि महत्व कोणालाही नाकारता येणार नाही. मात्र संपूर्ण देशात एक कायदा असला पाहिजे, कश्मीरमध्ये जो दहशतवाद उफळलेला आहे त्याची पाळेमुळे उखडून फेकली पाहिजेत, असेही ते म्हणाले.
काँग्रेसच्या जाहीरनाम्यातून पोटातील त्यांच्या ओठावर आलं असल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले. मी काँग्रेसचा जाहीरनामा वाचला नाही, पण आतापर्यंत आलेल्या वृत्तानुसार काँग्रेस जाहीरनामा प्रसिद्ध करण्याआधी जेव्हा त्यांचं सरकार होत त्यावेळी त्यांनी जे काय केलय ते पाहा ? असे ठाकरे म्हणाले.