Chandrasekhar Bawankule : अयोध्येतील रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच मंदिरात दाखल झाले आहेत. या सोहळ्यानिमित्त देशभरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. परंतु कॉँग्रेससह विरोधी पक्षातील काही नेत्यांनी या सोहळ्याला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला. यात ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांचा समावेश असून तेही अयोध्येत उपस्थित राहणार नाहीत.
उद्धव ठाकरे हे आज नाशिकमधील काळाराम मंदिरात श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा साजरा करणार आहेत. यावरून आता भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “उद्धव ठाकरे यांना निमंत्रण भेटूनही ते अयोध्येला गेले नाहीत. राजकीय हेवे-दावे बाजुला ठेवून उध्दव ठाकरे यांनी अयोध्येला जायला पाहिजे होते. फक्त निमित्त म्हणून काळाराम मंदिरात ते उत्सव करत आहेत. असंख्य भारतीय नियंत्रणाच्या प्रतीक्षेत होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी निमंत्रण न स्वीकारून चूक केली. आजचा दिवस सुवर्ण अक्षरात लिहिला जाणार आहे. देवेंद्र फडणवीस हे कारसेवक आहेत. त्यांनी काल फोटो ट्विट केला त्या वयात त्यांना अयोध्येत राम मंदिर व्हावे वाटले होते’, असं बावनकुळे यांनी म्हटले आहे.
दरम्यान आज 22 जानेवारी रोजी अयोध्येत रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होणार असून, गेल्या 500 वर्षांपासूनची भक्तांची प्रतीक्षा अखेर आज संपणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अयोध्येत रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. देश-विदेशातील लोक भगवान श्रीरामाच्या भक्तीत तल्लीन झाले आहेत.
राम जन्मभूमी असलेल्या अयोध्या नगरीला हजारो क्विंटल फुलांनी सजवण्यात आली आहे. सर्वत्र उत्सवाचे वातावरण असून बॉलिवूड कलाकारांनी देखील येथे हजेरी लावली आहे. एकीकडे आयोध्येत हा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा सोहळा होणार आहे, तर दुसरीकडे आज उद्धव ठाकरे हे नाशिकच्या काळाराम मंदिरात श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा साजरा करणार आहेत.