Uddhav Thackeray on PM Modi। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल राजस्थानमध्ये काँग्रेसवर टीका करत काँग्रेस देशाची संपत्ती जास्त मुलं असणाऱ्यांना वाटून टाकेल असे म्हटले. त्यांचा रोख मुस्लिमांकडे असल्याचे म्हटले जात आहे. त्यांच्या याच टीकेवर आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी खोचक सवाल उपस्थित केला आहे.
मग त्यांनी कमी मुलं असणाऱ्यांना संपत्ती का वाटली नाही? Uddhav Thackeray on PM Modi।
पंतप्रधानांच्या वक्तव्यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी,”भाजप आणि शिवसेनेची युती असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात कितीवेळा आले, याची आकडेवारी बघा. पण आता पंतप्रधान मोदी हे महाराष्ट्रातील गल्लीबोळात फिरत आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक सभेत पंतप्रधान मोदीजातीय समीकरण पेरण्याचा प्रयत्न करत आहेत. नुकत्याच झालेल्या एका सभेत मोदींनी काँग्रेसवर आरोप करताना म्हटले की, काँग्रेस पक्ष सत्तेत आला तर जास्त मुलं असणाऱ्यांना सगळी संपत्ती वाटून टाकतील. पण मग पंतप्रधान मोदी 10 वर्षांपासून सत्तेत होते. मग त्यांनी कमी मुलं असणाऱ्यांना संपत्ती का वाटली नाही?, असा खोचक सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.
मुळात कोणाला जास्त मुलं होतात आणि कोणाला कमी मुलं होतात, हे पंतप्रधान मोदींना कसे कळते, हे देव जाणे. ते पंतप्रधान आहेत, कदाचित त्यांच्याकडे तशी यंत्रणा असेल, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. ही निवडणूक आपल्यासाठी जगण्यामरण्याचा प्रश्न आहे, आपल्याला स्वातंत्र्यात जगायचं आहे की पारतंत्र्यात जगायचं आहे, याचा फैसला करणारी आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
महाराष्ट्राबद्दल इतका आकस का? Uddhav Thackeray on PM Modi।
या प्रचारसभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. त्यांनी म्हटले की, विदर्भाचा विकास तुम्ही १० वर्षात का केला नाही? एकही उद्योग तुम्ही राज्यात का आणला नाही विदर्भात का आणला नाही? सगळे उद्योग गुजरातला, एवढा महाराष्ट्र बद्दल आकस का? हे तुम्हला अंगठे दाखवताय, मिळत काही नाही. आम्हाला भारत सरकार हवय, मोदी सरकार नको, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गटाच्या प्रचारगीतामधील ‘हिंदुत्त्व’ आणि ‘भवानी’ या शब्दांवर आक्षेप घेतला होता. त्यावर ठाकरे यांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’, अशा घोषणा देत केंद्रीय निवडणूक आयोगाला एकप्रकारे आव्हान दिले.