मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. अत्यंत निरर्थक आणि निराशवादी अर्थसंकल्प झाला. असे अधिवेशन नजीकच्या काळात तरी झाले नसेल. कबरीपासून कामरापर्यंत एवढेच मुद्दे या अधिवेशनात गाजले. लाडक्या बहिणींच्या 2100 रुपयांचे काय? कर्जमाफीचे काय झाले? असे अनेक सवाल उद्धव ठाकरेंनी केले आहेत. तसेच सौगात ए मोदींचे निर्लज्ज उदाहरण दिसलं आहे. बटेंगे तो कटेंगे चा नारा देणारे सौगात देत आहेत, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. (Uddhav Thackeray) काय म्हणाले उद्धव ठाकरे? उद्धव ठाकरे म्हणाले, अधिवेशनाने महाराष्ट्राला काय दिले? अधिवेशनाने देशाला, राज्याला चांगलं गाणं दिलं. हे समाधान मानावे लागेल. कबरीपासून कामरापर्यंत असे अधिवेशन आहे. जयंत पाटील म्हणाले ते बरोबर आहे. सत्ताधाऱ्यांचा माज दिसला. या पूर्वी कधीही गेल्या काही वर्षात विरोधी पक्षाने राज्यपलांकडे जाऊन सत्ताधारी आपल्या पाशवी मताचा वापर कसा करतात आणि त्याचा वापर कसा करतात हे सांगितले. असं कधी घडलं नव्हतं, असं उद्धव ठाकरे म्हणाले. (Chief Minister Devendra Fadnavis) खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा पुढे बोलताना म्हणाले, खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा अशी म्हण आहे ना तशी या सरकारची अवस्था झाली आहे. सगळी आश्वासने फोल ठरली आहेत. सत्तेवर आल्यानंतर या सरकारची दडपशाही सुरु झाली आहे. पण दडपशाही ब्रिटिशांना जमली नाही यांनाही जमणार नाही. शिवसेना ही एकच आहे, शिवसेनेच्या गद्दारांचा गट मी मानतच नाही, असंही ठाकरे म्हणाले. सौगात ए मोदींचे निर्लज्ज उदाहरण आम्हाला जेव्हा मुस्लिम मते मिळाली तेव्हा यांचे डोळे पांढरे झाले होते. मात्र बोगस हिंदुत्ववादी किंवा बुरसटलेले लोक आहेत, त्यांना सौगात ए मोदींचे निर्लज्ज उदाहरण दिसलं आहे. बटेंगे तो कटेंगे चा नारा देणारे सौगात देत आहेत. वर्षभर शिमगा करायचा आणि ईद जवळ आली की मुस्लिमांना पुरणपोळी द्यायची हे यांचं धोरण आहे. भाजपाचं ढोंग उघडं पडलं आहे. मला चिंता अशी आहे, मोदी लोकसभेच्या प्रचारात म्हणाले होते की मंगळसूत्र चोरतील, आता हिंदूंचं मंगळसूत्र सुरक्षित आहे का? असा सवालही उद्धव ठाकरेंनी यावेळी विचारला. (Uddhav Thackeray )