Uddhav Thackeray : महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा अस्तित्वात आहे. मात्र जर कायद्याचे रक्षणकर्तेच अशा भोंदूबाबांच्या (Uddhav Thackeray) आहारी जाणार असतील, तर त्यांच्यावरही कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. राज्यातील सर्वच भोंदूबाबांवर कडक कारवाई झाली पाहिजे, मग त्यांच्या हातात कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा का असेना, अशा शब्दांत ठाकरेसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले. मुंबईत आयोजित एक्सपोर्ट इम्पोर्ट लॉजिस्टिक अभ्यासक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी उद्धव ठाकरे यांनी राज्यातील ज्वलंत विषयांवर आपली रोखठोक भूमिका मांडली. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून त्यांनी सरकारवर सडकून टीका केली. Uddhav Thackeray उद्धव ठाकरे म्हणाले, आपण नेमक्या कोणत्या पातळीवर जाऊन थांबणार आहोत, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. राज्याला प्रगतीच्या पथावर नेण्याचे स्वप्न आम्ही पाहत असताना, टाचण्या आणि लिंबू-उतारा यांसारखे विषय समोर येणे हे अत्यंत दुर्दैवी असल्याचेही त्यांनी नमूद केले. ज्यांचे स्वतःचे काही कर्तृत्व नसते, त्यांनाच अशा अघोरी मार्गांचा अवलंब करावा लागतो, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात या भोंदूबाबाला पाणीपुरवठ्यासाठी मदत करण्यात आल्याच्या आरोपांवरही उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, माझी कोणतीही तक्रार नाही, तुम्ही खुशाल सर्वांची चौकशी करा. हे पाणी नेमके कुठपर्यंत मुरले आहे, हे एकदा जनतेसमोर येऊ द्या. चौकशीच्या माध्यमातून सत्य बाहेर येणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी पारदर्शक तपासाचे समर्थन केले. खरात प्रकरणावरून लक्ष भरकटवण्यासाठी इतर गोष्टींचा आधार घेतला जात असल्याचा संशयही त्यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान, भाषणाचा समारोप करताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ओम फट स्वाहा… असे म्हणत राज्यातील सर्व भोंदूगिरीचा नायनाट करण्याचे आवाहन केले. गावोगावी पसरलेल्या अशा भोंदूबाबांविरुद्ध मोहीम उघडून सामान्य जनतेची फसवणूक थांबवावी, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली.