Devendra Fadnavis : जम्मू आणि काश्मीर (Jammu and Kashmir) राज्याला विशेष दर्जा देणारे राज्यघटनेतील कलम 370 रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय आज (दि.11) सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील न्या. संजय किशन कौल, न्या. संजीव खन्ना, न्या. बीआर गवई आणि न्या. सूर्यकांत यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला.
या प्रकरणी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सलग 16 दिवस सुनावणी झाली होती. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने 5 सप्टेंबर 2023 रोजी आपला निर्णय राखून ठेवला होता. त्यानंतर आता 96 दिवसांनंतर सोमवारी म्हणजेच 11 डिसेंबर 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर राजकिय विश्वातून अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहे.
आज अधिवेशनात आलेल्या शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) देखील आजच्या या महत्वपूर्ण निकालावर आपली प्रतिक्रिया दिली. तसंच मोदी काश्मिरी पंडितांची गॅरंटी घेणार का असा प्रश्न विचारला. मात्र, त्यानंतर या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं आहे.
यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, “पाकव्याप्त काश्मीर भारतात आलं पाहिजे ही प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे. आम्ही अखंड भारतावर विश्वास ठेवणारे लोक आहोत. जे असंभव वाटत होतं ते मोदींनी संभव करुन दाखवलं आपण काही काळ वाट पाहू. इतकी वर्षे हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी 370 हटवलं पाहिजे ही मागणी सातत्याने केली होती. त्यांची मागणी पूर्ण करण्याचं काम मोदींनी केलं.
मात्र मोदी जेव्हा हे काम करत होते, त्यावेळी उद्धव ठाकरेंची शिवसेनेची भूमिका राज्यसभेत वेगळी, लोकसभेत वेगळी. इकडेही आणि तिकडेही तबलाही आणि डग्गाही अशी राहिली आहे. त्यांना या संदर्भात बोलण्याचा अधिकारच नाही आहे. उद्धव ठाकरेंनी खरं म्हणजे वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी जे मुद्दे मांडले त्याच्या विपरीत भूमिका घेणाऱ्यांच्या भूमिकेला सातत्याने साथ दिली आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.
उद्धव ठाकरे काय म्हणाले…
“आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करतो. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे पुढच्या वर्षी काश्मीरमध्ये निवडणुका घेतल्या तर आनंदच होईल. परंतु, त्याआधी काश्मीर सोडून गेलेल्या काश्मिरी पंडितांना परत काश्मीरमध्ये आणण्याची गॅरंटी कोण देणार? येणाऱ्या निवडणुकांआधी ते परत येतील याची गँरंटी कोणी देईल का? पंतप्रधान मोदी तरी देतील का? कारण हल्ली गॅरंटीचा काळ आहे. ते सतत गॅरंटी-गॅरंटी म्हणत असतात.’ असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.