हिंगोली – आम्ही देशातील लोकशाही वाचवायला पुढे आलेलो आहोत. मेहबुबा मुफ्ती यांच्या मांडीला मंडी लावून मी बसलो होतो कारण त्या देखील तुमच्या लॉंड्रीमधून धुवून आलेल्या आहेत. असा घणाघात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत काही बोलणार नाही कारण मी काही बोललो तर त्याचा बोभाटा होतो असा टोला देखील यावेळी ठाकरेंनी लगावला.
गेल्या वेळेस फडणवीसांना फडतूस.. कलंक म्हणालो तर बोभाटा झाला. यावेळेस मी त्यांना थापाड्या म्हणणार होतो परंतु आता म्हणणार नाही अशा खरपूस शब्दात ठाकरेंनी फडणवीसांचा समाचार घेतला. राज्यात दुष्काळ पडायला लागलेला असताना फडणवीस जपाणला गेलेत.राज्यातील उद्योगधंदे गुजरात गेल्यावर मोदींकडून राज्याला यापेक्षाही मोठा उद्योग आणू असं ते म्हणाले होते त्यांनी जपानला जाण्यापेक्षा गुजरातला जायला हवे अशी टोलेबाजी देखील यावेळी ठाकरेंनी केली.
गद्दारांनी घात केला नसता तर महाराष्ट्र देशात नाही तर जगात नंबर वन झाला असता असं देखील ठाकरे यावेळी म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतील पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच हिंगोलीत सभा घेतली. या सभेतून ठाकरे यांनी राज्य सरकारसह केंद्र सरकारवर निशाणा साधला.यावेळी आगामी काळात होणाऱ्या भारत पाकिस्तान मॅचवरुन देखील ठाकरेंनी भाजपसह पंतप्रधानांवर निशाणा साधला.
वर्ल्डकपमधील भारत पाकिस्तान मॅचवरुन भाजपवर निशाणा
त्यांना आमची तुलना इंडियन मुजाहिद्दीन बरोबर करायची असेल तर अतिरेक्यांना पाकिस्तान पाठबळ देतो. मग आता जो वर्ल्डकप होणार आहे त्यातील हिंदुस्थान पाकिस्तान सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे हे तुमचं हिंदुत्व आणि राष्ट्र्यत्व आहे का ? असा सवाल यावेळी ठाकरेंनी उपस्थित केला.
हिंदुस्थान पाकिस्तान सामना तुम्ही तुमच्या स्टेडियममध्ये घेणार आणि देशप्रेमाचे धडे आम्हाला शिकवणार मग यापेक्षा सुषमा स्वराज बऱ्या होत्या त्यांनी सडकून सांगितलं होत जोपर्यंत पाकिस्तान घुसखोरी थांबवणार नाही तोपर्यंत त्यांच्याशी कोणतेही संबंध आम्ही ठेऊ इच्छित नाही याला म्हणतात देशप्रेम असं देखील ठाकरेंनी यावेळी ठणकावून सांगितलं.