Uddhav Thackeray : शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी नाशिकच्या पदाधिकारी मेळाव्यात शिवसैनिकांशी संवाद साधला. शिवसैनिकांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर सडकुन टीका केली. भाजपकडून नेहमीच फोडाफोडीचे राजकारण करण्यात येते असा आरोप केला. त्यासोबतच सुरेश भट यांच्या कवितेच्या ओळी वाचत भाजपवर निशाणा साधला. पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी, “तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवू नका. तुमची जन्म कुंडली मांडा. तुमच्या पत्रिकेत राहु केतू असतील कारण तुमचा गुरु चांगला नाही. आज मलाही थोडा पश्चात्ताप होतो आहे कारण त्यावेळी शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्व आणि भगव्यासाठी आपण एकत्र झालो होतो. पण हे भगव्यामध्ये भेद करणारे नालायक आहेत असे म्हणत भाजपवर टीका केली. पुढे बोलताना, “हे लोक भगव्यामध्ये दुही माजवत आहेत. जय श्रीराम म्हणून काय होणार आहे? तशी घोषणा करणार असाल त्या रामासारखं वागा असेही उद्धव ठाकरे म्हणाले. मी आज मुद्दामहून सुरेश भेट यांच्या ओळी वाचून दाखवतो आहे, असे म्हणत कवितेतील काही ओळी उद्धव ठाकरे यांनी यावेळी वाचल्या . हे असे आहेत तरीपण हे असे असणार नाही दिवस आमचा येत आहे तो घरी बसणार नाही हे खरं आहे की आज त्यांनी घेतले सारेच ठेके पण उद्या त्यांच्या चितेवर एकही रडणार नाही…. या कवितेच्या ओळीतून त्यांनी भाजपवर निशाणा साधला. त्यांनी पुढे “तुम्ही जिवंत आहात, जागरुक आहात. तुम्हाला लढायचं कसं ते शिकवावं लागणार नाहीत. औरंगजेब म्हणाला होता की मराठ्यांना पराक्रम शिकवावा लागत नाही. इथे गवताला भाले फुटतात. आता गरज आहे ती त्याच्या पुढच्या वाक्याची. भाजपा जे करतं आहे ते महाराष्ट्रात खडकावर दुहीचं बीज फेकलं तर ते मोठ्या प्रमाणावर फोफावतं. आज भाजपाची हीच नीती आहे. मात्र भाजपाची जी नीती आहे ती तोडा फोडा आणि राज्य कराची आहे. ही नीती इंग्रजांची आहे. श्यामाप्रसाद मुखर्जींनी मुस्लीम लिग बरोबर सरकार स्थापन केलं होतं. त्यावेळी चले जाव चळवळ चिरडण्यासाठी पत्र दिलं होतं. हिंदुत्व काय आहे ते आम्हाला शिकवू नका. आम्ही छत्रपती शिवरायांचे भक्त आहोत, भवानी मातेचे आहोत असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.