मुंबई : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा झाली असून, राज्य निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे. येत्या २ डिसेंबरला २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठी मतदान होणार असून, ३ डिसेंबरला निकाल जाहीर होईल. नामांकन प्रक्रिया १० नोव्हेंबरला सुरू होईल आणि १७ नोव्हेंबरला संपेल. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली असून, पक्षांतरांना वेग आला आहे. दुसऱ्या पक्षातील नेत्यांना आपल्या सोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अशातच शिवसेना (ठाकरे गट)ला मोठा धक्का बसला असून, नाशिकमधून महत्वाची बातमी समोर आली आहे. हेमंत वाजे आज भाजपात प्रवेश करणार नाशिक जिल्ह्यातील सिन्नर नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपाने मोठी राजकीय खेळी खेळली आहे. शिवसेना (ठाकरे गट)चे खासदार राजाभाऊ वाजे यांचे सख्खे काका आणि माजी नगराध्यक्ष हेमंत वाजे येत्या काही तासांत मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार आहेत. हेमंत वाजे हे सिन्नर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार होते. भाजपाने ठाकरे गटाचा थेट संभाव्य उमेदवारच आपल्या सोबत घेतल्याने, हा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. हेमंत वाजे हे यापूर्वी सिन्नर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष, गटनेते आणि उपनगराध्यक्ष राहिले आहेत. त्यांच्या आई रुक्मिणी वाजे या आमदार होत्या, तर वडीलही नगराध्यक्ष होते. अशा राजकीय वारशाच्या पार्श्वभूमीवर हेमंत वाजे यांना गळाला लावण्यात भाजपाचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांचा मोठा हात आहे. या खेळीमुळे केवळ ठाकरे गटालाच नाही, तर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही धक्का बसला आहे. राष्ट्रवादीत हेमंत वाजे यांच्या तुलनेत नगराध्यक्षपदासाठी तुल्यबळ उमेदवार नसल्याने, आमदार माणिकराव कोकाटे यांची या मतदारसंघात कोंडी होण्याची शक्यता आहे. भाजपाला फायदा, ठाकरे गट व राष्ट्रवादीची चिंता वाढली हेमंत वाजे यांच्या भाजप प्रवेशामुळे सिन्नरमध्ये भाजपाकडून त्यांनाच नगराध्यक्षपदाचे तिकीट मिळण्याची शक्यता बळावली आहे. ही घटना महायुतीच्या बाजूने महत्वाची ठरत असून, ग्रामीण भागात भाजपची पकड मजबूत करण्याच्या रणनीतीचा भाग मानली जात आहे. दुसरीकडे, ठाकरे गटासाठी हा अपेक्षित नसलेला धक्का असून, स्थानिक पातळीवर पक्षाची ताकद कमी होण्याची भीती आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटालाही या पक्षांतराचा फटका बसला असून, नाशिक ग्रामीणमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.