सातारा (प्रतिनिधी) – सातारा शहराच्या मोठ्या भागाची तहान भागवणाऱ्या कास धरणाची उंची वाढविण्याचे काम बंद पाडणाऱ्या ग्रामस्थांच्या समस्यांचे खा. उदयनराजे भोसले यांनी रविवारी जागेवरच निराकरण केले. गावठाणासह इतर पायाभूत सुविधांची कामे सुरू करण्यात आल्याचे उदयनराजेंनी सांगताच ग्रामस्थांचा विरोध मावळला.
सड्यावरून गावात येणाऱ्या रस्त्यासाठी वन विभागाबरोबर पुन्हा बैठक लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले; परंतु कास धरण कृती समिती स्थापन करण्याची मागणी फेटाळून लावण्यात आली. दरम्यान, कास धरणाचे काम 15 मेपर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास उदयनराजेंनी व्यक्त केला.
कास धरणाची उंची वाढविण्याच्या कामाला खा. उदयनराजे यांनी रविवारी सकाळी भेट दिली. उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, ऍड. दत्ता बनकर, बांधकाम समिती सभापती सिद्धी पवार, आरोग्य समिती सभापती अनिता घोरपडे, नियोजन समिती सभापती स्नेहा नलावडे, पाणी पुरवठा समिती सभापती सीता हादगे, मुख्याधिकारी अभिजित बापट, जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
धरणाच्या भिंतीवर दोन दिवसांपूर्वी आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांनी उदयनराजेंची भेट घेतली. कास गावठाण, स्मशानभूमी, मंदिर, इतर पायाभूत सुविधा, गावालगत पठारावरून जाण्यासाठी नवा रस्ता, कास धरण कृती समिती यासंदर्भात ग्रामस्थांनी उदयनराजेंशी चर्चा केली. पायाभूत सुविधांच्या मागण्या मान्य करून समिती स्थापन करण्याची मागणी त्यांनी फेटाळली. सर्व समस्यांचे निराकरण केल्याने ग्रामस्थांनी उदयनराजेंना धन्यवाद दिले.
साठ कोटी रुपयांवर बजेट पोहोचलेल्या कास धरणाचे इंटेक वेलसह 80 टक्के काम झाले आहे. काम पूर्ण झाल्यावर धरणात अर्धा टीएमसी पाणीसाठा होणार आहे. सांडव्यांच्या भिंतीच्या मजबूतीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. या कामासाठी कास पठारावरून तलावाकडे येणारा रस्ता जलसंपदा विभागाकडून बंद करण्यात येणार असून, बामणोलीकडे जाणारी वाहने एकीवकडून जातील, असे जलसंपदा विभागाच्यावतीने सांगण्यात आले.
या कामाची माहिती उदयनराजेंनी घेतली. हे काम झाल्यावर हा परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित होऊन स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहेत. सातारा विकास आघाडीने वचननामा पूर्ण केला आहे. धरण व पुनर्वसन ही कामे समांतर सुरू राहतील. युनेस्कोच्या निकषांप्रमाणे कास परिसर येत्या काही वर्षात आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ म्हणून उदयास येईल, अशी ग्वाही उदयनराजेंनी दिली.
नगराध्यक्षांच्या गैरहजेरीची चर्चा
या दौऱ्यात नगराध्यक्ष माधवी कदम यांची गैरहजेरी प्रकर्षाने जाणविली. एका पुरस्कार कार्यक्रमासाठी नगराध्यक्ष काल (दि. 13) महाबळेश्वरला गेल्या होत्या; पण कास पाहणी दौऱ्यात त्या दिसल्या नाहीत. या दौऱ्यात सर्व समित्यांच्या महिला सभापती उपस्थित होत्या. त्यामुळे नगराध्यक्षांच्या गैरहजेरीची चर्चा झाली.
साताऱ्यात उभी राहणार दोन हजार घरे
कास दौऱ्यानंतर उदयनराजे यांनी माजगावकर माळावर पंतप्रधान आवास योजनेतून होणाऱ्या घरकुलांच्या जागेची पाहणी केली. तेथे गरजू लोकांसाठी दोन हजार घरे बांधली जाणार असून, ही योजना दोनशे कोटींची आहे.
“कचराकुंडीमुक्त’ व “झोपडपट्टीमुक्त शहर’, अशी घोषणा वीस वर्षांपूर्वी आम्ही केली होती. शहर कचराकुंडीमुक्त झाले आहे. लवकरच झोपडपट्टीमुक्त होणार असल्याचे समाधान आहे, अशी प्रतिक्रिया उदयनराजेंनी दिली.