सातारा -विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यामध्ये शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी सुमारे अर्धा तास कमराबंद चर्चा झाली. या भेटीमुळे साताऱ्यातील अनेकांच्या भुवया उंचावल्या. जिल्हा बॅंक निवडणुकीच्या संदर्भात दोघांमध्ये चर्चा झाल्याचा अंदाज आहे.
जिल्ह्याच्या राजकारणात काही वर्षांपूर्वी रामराजे व उदयनराजे यांच्यातील टोकाची राजकीय कटुता जनतेने अनुभवली आहे. अलीकडच्या काळात उदयनराजे यांचा रामराजेंच्या विरोधाचा सूर निवळला आहे. रामराजे व उदयनराजे यांची शासकीय विश्रामगृहातील भेट झाल्याने साताऱ्याच्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. जिल्हा बॅंकेची निवडणूक तोंडावर असल्याने ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
विश्रामगृहातील कक्ष क्रमांक एकमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा झाली. त्यानंतर एकमेकांचा निरोप घेताना दोघांमध्ये हास्यविनोद रंगला. जिल्हा बॅंकेत भाजपला रोखण्याची राष्ट्रवादीची रणनीती आहे. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर व आ. जयकुमार गोरे यांचे अर्ज वैध ठरल्याने राष्ट्रवादीला धक्का बसला आहे.
शिवाय बॅंकेचे अध्यक्ष आ. शिवेंद्रसिंहराजे व पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनीही उदयनराजेंना वगळून जिल्हा बॅंकेचे राजकारण करण्याची रणनीती आखल्याची चर्चा आहे.
या पार्श्वभूमीवर रामराजे-उदयनराजे भेट लक्षवेधक ठरली आहे. रामराजे व उदयनराजे यांचा एकमेकांना असलेला विरोध नवरात्रोत्सवात मावळल्याचे दिसून येत आहे. याभेटी संदर्भात पत्रकारांनी छेडले असता रामराजे म्हणाले, उदयनराजे व आमच्या घराण्याचे नऊ पिढ्यांचे सबंध आहेत.
ही भेट अनौपचारिक होती. त्याचे राजकीय अर्थ काढू नयेत. ही भेट जिल्हा बॅंक निवडणुकीसंदर्भात होती का, असे विचारल्यावर रामराजे म्हणाले, अजून निवडणूकच जाहीर झाली नाही, तर चर्चा काय करणार?