हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील पोतरा तेलंगवाडी परिसरात शुक्रवारी (ता. १२) सकाळी बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या दगावल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व शेतमजूरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कळमनुरी तालुक्यातील पोतरा तेलंगवाडी शिवारातील शेतकरी काशीराम मोदे यांच्या शेतातील आखाड्यावर बांधलेल्या दोन शेळ्यांवर रात्रीच्या वेळी बिबट्याने हल्ला केला. सकाळी काशीराम शेतात गेले असता त्यांना दोन शेळ्या मृतावस्थेत आढळल्या. मानेवर झालेल्या हल्ल्यामुळे हा बिबट्याचाच हल्ला असल्याचा प्राथमिक निष्कर्ष वन विभागाने काढला आहे. घटनेची माहिती मिळताच विभागीय वन अधिकारी राजेंद्र नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार यांच्यासह वन कर्मचाऱ्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मृत शेळ्यांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. तसेच, काशीराम मोदे यांना तातडीची शासकीय आर्थिक मदत मिळवून देण्याची कार्यवाही वन विभागाने सुरू केली आहे. वन विभागाने या परिसरात बिबट्याचा वावर निश्चित केला असून, शेतकरी व शेतमजूरांनी अत्यंत काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. रात्री व पहाटेच्या वेळी शेतात एकट्याने जाणे टाळावे आणि आवश्यक असल्यास गटाने जावे. घरात आणि आखाड्यावर घराबाहेर झोपणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, वन विभागाने या भागात बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ट्रॅप कॅमेरे बसवण्याची तयारी सुरू केली आहे. वन किंवा वन्यजीवांसंदर्भात कोणतीही संघर्षाची स्थिती आढळल्यास तत्काळ हेलो फॉरेस्ट १९२६ या हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.