पुणे – ऐन लॉकडाऊन काळात स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी निघून गेलेल्या एका कुटुंबाला घरातील तीन श्वानांचा विसर पडला. त्यामुळेच जवळपास आठवड्याहून अधिक काळ अन्न-पाण्याविना घरात अडकून पडलेल्या तीनपैकी एका कुत्र्याने आपले प्राण गमावले. तर इतर दोघांची अवस्था अतिशय वाईट झाली होती. प्राणी-पक्षी संरक्षणासाठी कार्यरत संस्थेला याबाबतची माहिती मिळताच, त्यांनी तत्काळ याठिकाणी जाऊन कुत्र्यांची सुटका केली.
एका कुटुंबाने आपल्या घरातील तीन पाळीव कुत्र्यांना वाऱ्यावर सोडून दिले. यामध्ये पग, लॅब्रोडोर आणि एक गोल्डन रिट्रिव्हर प्रजातील कुत्र्याचा समावेश आहे. अन्न-पाण्याशिवाय जवळपास एक आठवड्याहून अधिक काळ ही कुत्री घरात होती. अनेकदा काकुळतीने मदतीसाठी ओरडतही होती. मात्र, या दरम्यान त्यांना कोणतीही मदत मिळालेली नव्हती. त्यामुळेच एका कुत्र्याचा मृत्यू झाला. त्याचे पार्थिवही अनेक दिवस घरात पडून होते.
तर, इतर दोन कुत्रेही अन्न पाण्याशिवाय अतिशय कमकुवत झाली होती. पाण्याने तरफडताना घरातील माठात पाणी मिळेल या आशेने तोंड खुपसलेल्या एका कुत्र्याचे तोंड या माठात अडकले आणि त्यातून बाहेर पडण्याच्या नादात माठ फुटले. पण त्याचे तोंड कुत्र्याच्या गळ्यात अडकल्याने वारंवार इजा होत होती. अशा दुरावस्थेत असलेल्या या प्राण्यांबाबत माहिती मिळताच, रेस-क्यू या प्राणीप्रेमी संस्थेने त्यांची सुटका केली.
संस्थेने सुटका केलेल्या कुत्र्यांना रेस-क्यू संस्थेच्या केंद्रात देखभालीसाठी ठेवण्यात आले आहे. तसेच या कुत्र्यांच्या मालकाचा शोध घेऊन सोसायटी ऑफ प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्टी अगेन्स्ट ऍनिमल (एसपीसीए) तर्फे त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करून, सक्त ती कारवाई केली जाणार आहे. याबाबत पोलिसांकडेही तक्रार देण्यात आली आहे.
– नेहा पंचमिया,संस्थापिका, रेस-क्यू