डोर्लेवाडी – मेखळी-सोनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेवर डोर्लेवाडी, झारगडवाडी, सोनगाव, मेखळी ही चार गावे अवलंबुन आहेत. सध्या या पाणीपुरवठा योजनेतील तलावात अत्यंत कमी पाणीसाठा शिल्लक असल्याने चारही गावांना दोन दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. यामुळे या योजनेवर आवलंबुन असणाऱ्या चार गावांतील नागरिकांची गैरसोय होणार आहे.
बारामती नगर पालिका हद्दीतील तीन हत्ती चौक येथील कालवा पुलाचे काम सुरू असल्यामुळे मेखळी- सोनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेत नियमित वेळेत सुटणारा नीरा डावा कालव्याचे पाणी सुटण्यास विलंब होत आहे. साधारण आठ दिवस पाणी येणार नाही. त्यामुळे पुढील आठ दिवस दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. तरी सगळ्यांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन योजनेचे अध्यक्ष अलका दिगंबर भोपळे आणि सचिव एम. एस. आगवणे यांनी केले आहे.
बारामती येथील नीरा डावा कालव्याचे काम सुरू आहे. यामुळे आणखी 5 दिवस तलावात पाणी येणार नाही. दरम्यान, रविवारी (दि. 15) कालव्यातून पाणी सोडले जाणार असून हे पाणी सोनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या तलावात मंगळवारी (दि. 17) पाणी येणार आहे, त्यामुळे चारही गावांतील नागरिकांसाठी या योजनेतून दोन दिवसांआड पाणी सुटणार आहे, त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा.
बाळासाहेब सलवदे, सरपंच, डोर्लेवाडी