जम्मू – पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्रसंधी भंगाचे सत्र कायम ठेवत शनिवारी भारतीय हद्दीत विविध ठिकाणी मारा केला. त्यामध्ये भारतीय सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) दोन जवान जखमी झाले. दरम्यान, भारतीय जवानांनी पाकिस्तानी माऱ्याला जबर प्रत्युत्तर दिले.
पाकिस्तानी सैनिकांनी नियंत्रण रेषेच्या (एलओसी) आणि आंतरराष्ट्रीय सीमेच्या (आयबी) लगत असणाऱ्या जम्मू-काश्मीरमधील विविध क्षेत्रांत गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा केला. त्याचे लक्ष्य भारतीय सीमा ठाण्यांबरोबरच नागरी वस्तीही ठरली.
पूँच जिल्ह्यातील मेंढर क्षेत्रात पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या माऱ्यात बीएसएफचे दोन जवान जखमी झाले. त्यांना उपचारासाठी तातडीने नजीकच्या रूग्णालयात हलवण्यात आले. कठुआ जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतही पाकिस्तानी मारा झाला. त्यामुळे सीमाभागांत राहणाऱ्या रहिवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले.
पाकिस्तानी सैनिकांकडून शस्त्रसंधी भंगाच्या कुरापती सातत्याने केल्या जातात. पाकिस्तानी माऱ्याला चोख प्रत्युत्तर देण्याचे धोरण भारतीय सुरक्षा दलांकडून अवलंबले जात आहे. त्या प्रत्युत्तरात पाकिस्तानी बाजूचीही मोठी हानी होत असते. मात्र, त्यातून पाकिस्तानला शहाणपण सुचताना दिसत नाही.