संभळ – उत्तर प्रदेशात पोलिसांनी बेकायदेशीर शस्त्रास्त्रांचे दोन कारखाने उघड केले. या प्रकरणी एकूण चार जणांना अटक करण्यात आली आहे. शस्त्रास्त्रांचे हे दोन्ही कारखाने नक्षा पोलिस ठाणे आणि राझापूर पोलिस ठाण्याच्याच्या हद्दीमध्ये जंगलांमध्ये चालवले जात होते. पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये देशी बनावटीची 24 काडतुसे, देशी बनावटीची पिस्तुले आणि शस्त्रास्त्र बनवण्याचे अन्य साहित्यही जप्त केले.
यापैकी एका प्रकरणामध्ये चार जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र दोघांनी घटनास्थळावरून पळ काढला, असे संभळ पोलिस अधिक्षक यमुना प्रसाद यांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी “एफआयआर’दाखल केली असून पळून गेलेल्या दोघाजणांचा शोध घेतला जात आहे, असे पोलिसांनी सांगितले. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर शस्त्रास्त्रांच्या बेकायदेशीर व्यवहारांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून ही कारवाई केली गेली आहे.