पुणे – जिल्हा बॅंकांना यंदा खरिपाचे 2 हजार 758 कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आतापर्यंत खरिपाचे 2 हजार 358 कोटी रुपयांचे पीक कर्जवाटप केले आहे. 85 टक्के उद्दिष्ट पूर्ण होणे ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने समाधानाची बाब आहे.
खरीप कर्जवाटपाचे पूर्ण उद्दिष्ट गाठण्यासाठी बॅंकांनी सुक्ष्म नियोजन करावे. जिल्ह्यातील बॅंकांनी खरीप पीक कर्जाचे उद्दिष्ट येत्या 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करावेत, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय बॅंकर्स समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी रिझर्व बॅंक ऑफ इडिंयाच्या एफआयडीडीचे व्यवस्थापक पियुष गोयल, नाबार्डचे रोहन मोरे, बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या उपमहाव्यवस्थापक वीणा राव, जिल्हा अग्रणी बॅंकेचे श्रीकांत कारेगावकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या (डीआरडीए) प्रकल्प संचालक शालिनी कडू पाटील आणि जिल्ह्यातील विविध बॅंकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, बॅंकांनी शेतकऱ्यांना खरीप कर्जवाटप व विविध सरकारी योजनांच्या कर्ज वाटपासाठी वर्षाच्या सुरुवातीपासूनच काटेकोरपणे नियोजन करावे, जेणेकरून उद्दिष्ट गाठणे शक्य होईल. त्यासाठी शासकीय योजनांबाबतचा विभागीय पातळीवरील अधिकाऱ्यांसमवेत आढावा घेण्यात येईल.
पंतप्रधान स्वनिधी योजनेबाबत दि.16 सप्टेंबर रोजी शिबिर आयोजित करावे. युवकांना स्वयंरोजगारासाठी ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेअंतर्गत स्थानिक पातळी व संस्थांमध्ये प्रशिक्षण घेण्यास परवानगी देण्यात येत आहे.