Tushar Gandhi : गांधीवादी क्रांतिकारक, बंदुकधारी नव्हे; तुषार गांधी यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा

नागपूर : गांधीवादी निश्चितच क्रांतीकारी आहेत. क्रांतिकारक ते आहेत जे सत्तेत असलेल्या लोकांना झोपेतून जागे करतात. त्यामुळे, सत्तेत असल्यांना त्यांची भीती वाटणे स्वाभाविक आहे. यामुळेच गांधीवादी विचारसरणीला सत्ताधारी घाबरत आहे. गांधीवादी हे क्रांतीकारी असून बंदुकधारी नाही, असे म्हणत महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
विधानसभेत भाषण देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारत जोडो यात्रेत नक्षलवादी संघटनांचा समावेश आहे, असा आरोप केला होता. याचा तुषार गांधी यांनी चांगलाच समाचार घेतला. समाजात शांती आणि सद्भावना वाढावा यासाठी समविचारी पक्षाच्या वतीने २९ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. यासंदर्भात तुषार गांधी यांनी प्रेस क्लबमधील पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी संविधान सत्याग्रह यात्रा समितीचे मुख्य समन्वयक संदेश सिंगलकर उपस्थित होते.
तुषार गांधी म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांधीवादी संघटना शहरी नक्षलवादी असल्याचा ठपका ठेवला होता. परंतु, गांधीवादी हे क्रांतीकारी आहेत. हेच क्रांतीकारी सत्तेत असणाऱ्यांची झोप उडवतात. त्यामुळे फडणवीसांना आमचा राग येणे स्वाभाविक आहे. तसेच ते स्वतः ज्या विचारधारेतून येतात त्यांना गांधी विचारांची कायम भीती असते. त्यामुळे त्यांच्या आरोपांचे नवल नाही. आम्ही क्रांतीकारी आहोत पण बंधुकधारी नाही, अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.
गांधी जयंती आणि विजयादशमी २ ऑक्टोबरला एकाच दिवशी येते. या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी सोहळा जल्लोषात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्याला महात्मा गांधी यांचा विचार अधिक बुलंद करण्याची गरज आहे. संविधानाचे रक्षण करणारे लोक या देशात आहेत हे दाखवण्यासाठी इंडिया आघाडीमधील घटक पक्ष आणि विविध क्षेत्रात काम करणाऱ्या समविचारी संघटनांना सोबत घेऊन द्वेषाच्या राजकारणाविरोधात ही यात्रा राहणार आहे, असे त्यांनी सांगितले.





